कोल्हापूर : वाढत्या गर्दीमुळे भाजी मंडई कोरोना हॉटस्पॉट ठरण्याच्या भीतीने महापालिका प्रशासकांनी भाजी मंडई बॅरिकेटस् लावून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी त्याला विरोध झाला, तरी शनिवारी महापालिका अधिकच आक्रमक झाल्याने विक्रेत्यांनी मंडई बंदच ठेवली. त्यामुळे कायम गजबजलेली मंडईत शुकशुकाट होता; पण किरकाेळ माल विक्रीसाठी रस्त्यावर आल्याने सकाळी ११ पर्यंत रस्त्यावर गर्दी दिसत होती.
भाजी मंडईत कोणत्याहीप्रकारे सोशल डिस्टन्सचे पालन होत नसल्याने आणि कोरोनाग्रस्तांची संख्या रोजची दीड हजारापर्यंत जात असल्याने महापालिका प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी शहरातील सर्व मंडई बंद ठेवण्याचे आदेश काढले होते, पण याला मंडईतील विक्रेत्यांकडून विरोध होता, तरीदेखील पोलीस प्रशासनाची मदत घेत बलकवडे यांनी मंडईना बॅरिकेटस् लावून बंद केले. शनिवारी सकाळी मंडई उघडलीच नाही, जेथे उघडली तेथे पोलिसांनी लगेच दंडुका उगारल्यानंतर लगेच सर्व माल झाकून ठेवत व्यापारी परतले.
मंडई बंद असल्याने बरेचसे विक्रेते रस्त्यावर येऊन विक्री करू लागले. ११ पर्यंत रस्त्यावर फिरून विक्री करण्याची मुभा असल्याने विक्रेत्यांनी गाडी, टेम्पो, सायकलवरून गल्लोगल्ली फिरुन भाजीपाला विक्रीचा पर्याय जवळ केल्याचे दिसत होते. मंडई बंद असली, तरी ग्राहकांची मात्र रस्त्यावर गर्दी दिसत होती.
ग्रामीण भागातून शहरात येऊन विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही जास्त आहे. रस्त्याकडेला बसण्याची मुभा दिली असली तरी त्यालाही मर्यादा येत असल्याने भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
०८०५२०२१-कोल-भाजी मंडई
फोटो ओळ : कोल्हापुरात शनिवारी भाजी मंडई बंदच्या निर्णयाची कडक अंमलबजावणी झाल्याने नेहमी ओसंडून वाहणाऱ्या कपिलतीर्थ मंडईत असा शुकशुकाट होता.
(छाया : आदित्य वेल्हाळ )