कसबा बावडा: तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीमध्ये चौदावा व पंधरावा वित्त आयोगातून कामे सुरू आहेत. मात्र या कामाचे मूल्यांकन शंभर रुपये आणि प्रत्यक्षात काम पन्नास रुपयाचे होते. त्यामुळे या कामाची चौकशी व्हावी, अशी मागणी करवीर पंचायत समितीच्या मासिक सभेत सदस्य चंद्रकांत पाटील यांनी केली. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती मंगल पाटील होत्या. यावेळी उपसभापती अविनाश पाटील, गटविकास अधिकारी जयवंत उगले यांची प्रमुख उपस्थिती होती. सभेला विविध विभागाचे अधिकारी येत नाहीत. त्यामुळे या अधिकाऱ्यांच्यावर काय कारवाई करणार असा सवाल राजेंद्र सूर्यवंशी, प्रदीप झांबरे, इंद्रजित पाटील, यशोदा पाटील, अश्विनी धोत्रे, अर्चना खाडे, शोभा राजमाने, सविता पाटील यांनी केला. काही सदस्यांनी तर सभा तासभरासाठी तहकूब करा असा आग्रह धरला. तर काही सदस्यांनी या अधिकाऱ्यांचे तत्काळ निलंबन करा, अशी मागणी केली. उपसभापती अविनाश पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस पाठवू, असे सांगितल्याने संतप्त झालेले सदस्य शांत झाले.
चौकट : रस्त्यांना डांबर कधी लागणार
तालुक्यात कोविड लस मोठ्या प्रमाणात शिल्लक असून सदस्यांनी आपल्या गावात कॅम्प लावावेत, अशी सूचना तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नलवडे यांनी केली. तालुक्यातील नादुरुस्त रस्त्यांना डांबर कधी लागणार असा सवाल प्रदीप झांबरे यांनी उपस्थित केला. अनेक ठिकाणचे रस्ते केल्यानंतर लगेच खराब होतात. यामध्ये शिपायापासून वरिष्ठांपर्यंत पैसे दिले जात असल्याने रस्त्याची वाट लागते, असा आरोपही प्रदीप झांबरे यांनी यावेळी केला.
तालुक्यातील अनेक पूरबाधित गावांचा, पिकांचा सर्व्हे अद्याप झालेला नाही. हा सर्व्हे कधी होणार आणि संबंधितांना नुकसान भरपाई कधी मिळणार असा सवाल राजेंद्र सूर्यवंशी यांनी केला.