कोल्हापूर : पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी राज्य सरकारने शेतीला बारा तास वीजपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी आज, गुरुवारपासून होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील १ लाख २८ हजार ९३३ कृषिपंपधारकांना त्याचा फायदा होणार आहे.जुलैमध्ये चांगला पाऊस झाला. मात्र, आॅगस्टअखेरपासून पावसाने दडी मारली आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेल्या पिकांना सध्या पाण्याची आवश्यकता आहे. ते लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषिपंपाला बारा तास वीजपुरवठा करण्यासाठी ‘महावितरण’ला वीजपुरवठ्याचे वेळापत्रक बदलण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार ‘महावितरण’ने कार्यवाही करीत बारा तास वीजपुरवठा करण्याचे नियोजन केले आहे. महावितरणकडून सध्या कोल्हापुरात आठवड्यातील तीन दिवस आठ तास वीजपुरवठा हा सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत केला जात होता. तसेच चार दिवस रात्री दहा तास वीजपुरवठा रात्री आठ ते सकाळी आठ या वेळेत करण्यात येत होता. यात क्रमवारीची पद्धत वापरली जात होती. मात्र, सरकारच्या नव्या निर्णयानुसार आता बारा तास वीजपुरवठा केला जाणार आहे. यात रात्री दहा ते सकाळी दहा आणि सकाळी दहा ते रात्री दहा अशा दोन टप्प्यांमध्ये फिडरनिहाय वीजपुरवठा करण्यात येणार आहे. याबाबतची सूचना ‘महावितरण’च्या वरिष्ठ कार्यालयाकडून बुधवारी सायंकाळी कोल्हापूर परिमंडळाला प्राप्त झाली. (प्रतिनिधी)शेतकऱ्यांना फायदाबारा तास वीजपुरवठा करण्याच्या निर्णयाचा शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे ‘महावितरण’च्या कोल्हापूर मंडळाचे कार्यकारी अभियंता (प्रशासन) एस. बी. मारुलकर यांनी सांगितले. चांगला निर्णय जिल्हा इरिगेशन फेडरेशनचे सेक्रेटरी मारुती पाटील म्हणाले, सध्या कृषिपंपांना आठ तास मिळणाऱ्या वीजपुरवठ्यामध्ये पाण्याचे फेरे पूर्ण होत नव्हते. कृषिपंपांना किमान दहा तास वीजपुरवठा व्हावा, अशी आम्ही वारंवार मागणी करीत होतो.
जिल्ह्यातील सव्वा लाख शेतकऱ्यांना बारा तास वीज
By admin | Updated: September 8, 2016 00:30 IST