कोल्हापूर : समाजाचे धु्रवीकरण करून सत्ता मिळविण्याचे प्रयत्न वर्तमानात घडत आहेत. अशा काळात सर्व मतभेद विसरून समविचारी व्यक्तींनी एकत्र येऊन संघर्ष करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री विनय कोरे यांनी केले.किसनराव आवळे प्रतिष्ठानतर्फे गुरुवारी राजर्षी शाहू स्मारक भवन येथे आयोजित विचार जागर परिषद व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार राजीव आवळे होते. यावेळी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे, शाहीर शीतल साठे, महापौर अश्विनी रामाणे, ज्येष्ठ सामाजिक विचारवंत डॉ. सुभाष देसाई, दलितमित्र व्यंकाप्पा भोसले, भारती आवळे, आदी उपस्थित होते. प्रा. जोगेंद्र कवाडे यांना क्रांतियोद्धा व शाहीर शीतल साठे यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, सन्मानचिन्ह,पुस्तके व मानपत्र असे होते. कोरे म्हणाले, आपण जातिधर्मावर किती दिवस चर्चा करीत बसणार आहोत याचा विचार करायला हवा. स्वत:ला दलित मागासवर्गीय म्हणणे बंद करून, आपल्यातील भांडणे संपवून एकत्र यायला हवे. आर्थिक न्याय मिळाला तर सामाजिक न्याय मिळणार आहे. त्यासाठी आरक्षण व्यवस्थेचा फेरविचार करण्याची गरज आहे. सरकारी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी व आर्थिक दरी कमी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. ’सरकारच्या धोरणांचा आढावा घेवून प्रा. कवाडे म्हणाले, आर्थिक सुबत्ता आली तरी जातीचा कलंक पुसला जात नाही अशी आपली व्यवस्था आहे. ती बदलल्याशिवाय सर्वसामान्यांना न्याय मिळणे शक्य नाही. आता आपण तक्रार करण्यापेक्षा प्रतिकार करायला शिकले पाहिजे.’ माजी मंत्री प्रा. ढोबळे म्हणाले, आरक्षण व अॅट्रॉसिटीच्या प्रश्नावर बोलण्यापूर्वी गावगाड्यातील सत्ताकारणाचा विचार जाणत्या नेत्यांनी करायला हवा, मगच ते रद्द करावेत, अथवा नाही ते ठरवावे. कोल्हापूरसारख्या शहरात मागासवर्गीय विद्यार्थ्यांची सतरा कोटींची शिष्यवृत्ती अजूनही दिली जात नाही ही चिंतनाची बाब आहे. राजीव आवळे यांनी पुरस्कारामागची भूमिका स्पष्ट केली. अनिल म्हमाणे प्रास्ताविक केले.आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी पुरस्कार म्हणून मिळालेली रक्कम पंचवीस हजार व स्वत:कडील पाच हजार असे एकूण तीस हजार रुपये विदर्भातील दुष्काळग्रस्त शेतकरी अनिता नागनाथ कोरे यांना मदत म्हणून दिली. (प्रतिनिधी)जातीयवादास विरोध कायमआमचा संघर्ष हा कोणत्याही जातीविरुद्ध नसून, तो जातीयवादाविरुद्ध आहे. मराठा आरक्षणासाठी प्रसंगी आम्ही रस्त्यावर उतरू. त्यांच्या लढ्याला आमचा जाहीर पाठिंबा आहे, असे राजीव आवळे यांनी व्यासपीठावरून सांगितले. विवेक जागर रॅलीया परिषदेच्या निमित्ताने पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ऐतिहासिक दसरा चौकातून दुचाकीवरून विवेक जागर रॅली काढली. त्यामध्ये जिल्ह्यातील विविध भागांतून आलेल्या कार्यकर्त्यांसह महिलांचाही सहभाग होता. रॅलीचा मार्ग दसरा चौक, बिंदू चौक, शिवाजी पुतळा, सीपीआर ते राजर्षी शाहू स्मारक भवन असा राहिला.स्वत:ची झोपडी बरी मोठे पक्ष म्हणजे त्यांच्या मनासारखे वागायला भाग पाडतात. ते सांगतील तेव्हाच बोलायचे, अशी बंधने लादतात. त्या पक्षांपेक्षा आपली वेगळी झोपडी हक्काची असली तरी उत्तम असते, असा माजी मंत्री विनय कोरे यांनी सल्ला देत राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षापासून दूर राहण्याचा सल्ला दिला.
धु्रवीकरण करून सत्ता मिळविण्याचा प्रयत्न
By admin | Updated: September 10, 2016 00:43 IST