मनोज मुळ््ये-रत्नागिरीकोकणचे नेते नारायण राणे यांनी दिलेला मंत्रीपदाचा राजीनामा आणि गेल्या काही काळात दिल्लीपासून गल्लीपर्यंत राजकारणात झालेले बदल यामुळे पुढच्या काही महिन्यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारणाची दिशाच बदलून जाणार असल्याचे स्पष्ट आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला महाराष्ट्रात पुन्हा सत्ता मिळाली नाही तर कोकणचा पुढचा नेता कोण याची चर्चा आता सुरू झाली आहे. त्यादृष्टीने शिवसेना-भाजपकडे कोकणचे नेतृत्त्व करणारी व्यक्ती नाही, हेही तितकेच खरे आहे.पक्षश्रेष्ठींनी दिलेला शब्द पाळला नाही, असा आक्षेप घेत नारायण राणे यांनी उद्योगमंत्रीपदाचा दिलेला राजीनामा अनेक अर्थांनी चर्चेत आला आहे. त्याचे जसे हायकमांड आणि राज्यस्तरावर पडसाद उमटले तसेच ते कोकणातही उमटू लागले आहेत. लोकसभा निवडणुकीचा रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघातील निकाल लागल्यापासूनच राणे यांची अस्वस्थता सुरू झाली. देशभरात मोदी लाट असली तरी रत्नागिरी-सिंधुदुर्गातील जनता आपल्या पाठीशी ठाम उभी राहील, असा प्रचंड विश्वास राणे यांना होता आणि त्यालाच तडा गेल्यामुळे ते खूप अस्वस्थ झाले. तो निकाल जाहीर होत असतानाच आपण मंत्रीपद सोडणार, आपण राजकारणात राहणार नाही, इतका विकास करूनही जनतेला त्याची कदर नाही, असे ते उद्विग्नपणे म्हणालेही. त्यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवलाही होता. अर्थात तो मंजूर झाला नाही.या निवडणुकांनंतर अपेक्षित बदल न झाल्याने राणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांची ही कृती कोकणातील राजकारणाला वेगळे वळण देणारी ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यभरातील राजकारणालाच वेगळे वळण मिळाले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीबाबतची नाराजी मोठ्या प्रमाणात पुढे येऊ लागली आहे. या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्येही मोठी मरगळ आहे. त्या तुलनेत शिवसेना-भाजपचे मनोबल वाढले आहे. तरीही सेना-भाजपकडे कोकणचे नेतृत्त्व करणारा नाही, हे पुढे आले आहे.अनंत गीते यांनी गेली पाच-सहा वर्षे रायगड मतदारसंघाकडेच लक्ष केंद्र्रीत केले आहे. विनायक राऊत रत्नागिरी-सिंधुदर्गचे खासदार असले तरी या दोन्ही जिल्ह्यात ते अगदीच नवखे आहेत. रामदास कदम यांच्याकडे कोकणच्या नेतेपदाची सूत्रे मिळू शकली असती. मात्र गेल्या काही वर्षात शिवसेनेने स्वत:च त्यांचे महत्त्व कमी केले आहे. शिवसेनेचे किंवा भाजपचे विद्यमान आमदार आपापल्या भागापुरतेच मर्यादीत आहेत. भाजपची ताकद मुळातच रत्नागिरी आणि गुहागर या मतदारसंघांपुरतीच अधिक आहे. पण तेथूनही कोकणला नेतृत्त्व मिळण्याची आशा नाही.नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतरची काही वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना औषधालाच दिसत होती. मात्र अलिकडच्या काळात वैभव नाईक यांनी कुठे ना कुठे शिवसेना जिवंत ठेवली आहे. भाजपची सिंधुदुर्गातील ताकदही मर्यादीत आहे. रायगड आणि ठाण्यातील नेतेही आपापल्या भागापुरतेच मर्यादीत आहेत. कोकणातील भाजप नेते, पदाधिकाऱ्यांच्या आशा विनोद तावडे यांच्यावर आहेत. मात्र तावडे यांनी कोकणात तळागाळात लक्ष दिलेले नाही. त्यांच्या महत्त्वाकांक्षा पुढच्या असल्यामुळे त्यांना कोकणपुरते स्वत:ला बांधून ठेवण्यात रस नाही. त्यामुळे कोकणचा नेता म्हणून कोकणात सर्वांना एकत्र करण्याची ताकद असलेला नेता युतीकडे नाही.नारायण राणे यांच्यापाठोपाठ सुनील तटकरे आणि भास्कर जाधव यांची क्षमता नोंद घेण्याइतकी आहे. मात्र राष्ट्रवादीला सिंधुदुर्गात फार मोठे स्थान नाही. दीपक केसरकर यांच्यारूपात मिळालेली विधानसभेची एक जागाही आता राष्ट्रवादीला मिळेल की नाही सांगता येत नाही. तटकरे यांनी आतापर्यंत सिंधुदुर्गात कधीही लक्ष घातलेले नाही. भास्कर जाधव यांनीही चिपळूण, गुहागर, खेड, दापोली, मंडणगड यापलिकडे जोर दिलेला नाही. काँग्रेसकडे तर कोकणची जबाबदारी पेलू शकणारे उल्लेखनीय असे दुसरे नावही नाही.राज्यातील राजकारणाला वळण मिळत असताना कोकणात मात्र नेतृत्त्वहीन वाटचाल होणार असल्याचे सध्यातरी दिसत आहे. विधानसभेत कोकणची लॉबी कधीच नव्हती. पण राज्यात युतीचे सरकार असताना १९९५ मध्ये सगळे आमदार, पंचायत समित्या, जिल्हा परिषद अशी सगळीच सत्तास्थाने युतीकडे होती. तेव्हापासून नारायण राणे यांच्याकडेच सर्व सूत्रे होती. ते काँग्रेसमध्ये गेल्यानंतर राज्यातील सरकार आणि स्थानिक पातळीवरील बहुतांश सत्तास्थाने काँग्रेसकडे असल्याने राणे यांच्याकडील कोकणचे नेतेपद अबाधित होते. मात्र राज्यात सत्ताबदलाचे वातावरण तयार होत असताना युतीकडे कोकण सांभाळणारा सक्षम नेता नाही, हे उघडपणे दिसत आहे.-शिवसेना-भाजपच्या नेत्यांना मतदारसंघांचीच मर्यादा-राज्यातील राजकारण बदलताना कोकण नेतृत्त्वहीन?-काँग्रेस-राष्ट्रवादीकडील पर्यायही मर्यादीतच-अनंत गीतेंचे लक्ष फक्त रायगडवरच-विनायक राऊत कोकणाला नवखेच.
कोकणच्या राजकारणाला बदलाचे वेध?
By admin | Updated: July 22, 2014 22:27 IST