लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पावणे तीनशे कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. पदोन्नतीमुळे शाखांमध्ये जागा रिक्त होत्या, त्याठिकाणी बदल्या झाल्या आहेत. विशेष म्हणजे या बदल्यांमध्ये संचालकांचा कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप होऊ दिलेला नाही.
जिल्हा बँकेच्या १९१ शाखांमध्ये १४०० कर्मचारी कार्यरत आहेत. बँकेवर प्रशासक आल्यानंतर तीन वर्षांनी बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचा ठराव करण्यात आला. एकाच ठिकाणी जास्त काळ कर्मचारी राहिले तर त्यांच्या हातून चुकीचे काम होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे या बदल्यास कर्मचारी युनियनेही मान्यता दिली आहे. मध्यंतरी ७८ शिपायांना पदोन्नती देत लिपिक केले होते. अनेक शाखांत शिपायाची पदे रिक्त झाली होती. मुळात अनेक शाखांमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने तिथे कामाचा ताण आहे. त्यामुळे बदल्या करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. कॅशियर, लिपीक, शिपाई अशा २७० कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. मुख्य कार्यालयातील शिपायांना शहरासह तालुक्यांतील विविध शाखांत बदल्या करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे संचालकांच्या सहमतीने बदल्या झाल्या असल्या तरी त्यामध्ये फारसा हस्तक्षेप झालेला नाही.