इचलकरंजी : शेतकरी व कामगारांच्या विविध मागण्यासंदर्भात तसेच केंद्र सरकारच्या निषेधार्थ संयुक्त किसान मोर्चाने सोमवार २७ सप्टेंबर रोजी भारत बंदची घोषणा केली. त्या पार्श्वभूमीवर शहरातील कोणत्याही व्यावसायिकांना बंद पाळण्याची सक्ती करू नये, असे आवाहन इनाम प्रणित व्यापारी असोसिएशनने केले आहे.
कोरोना महामारीच्या लॉकडाऊन, महापूर यामुळे शहरातील व्यापारी आधीच अडचणीत आले आहे. व्यापाऱ्यांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले असून त्यास बऱ्याच राजकीय पक्ष व संघटनांनी पाठिंबा दिला. असोसिएशनचा आंदोलनातील जनहिताच्या सर्व मुद्यांना पाठिंबा आहे. आंदोलनात सहभागी होणाऱ्या व्यापाऱ्यांची अडवणूक होणार नसून विनाकारण गर्दी जमवून बंदसाठी जबरदस्ती व सक्ती करू नये. तसेच पोलीस प्रशासनाने आंदोलकांना तशा सूचना द्याव्यात, असे इचलकरंजी नागरिक मंच प्रणित व्यापारी असोसिएशनतर्फे आवाहन केले आहे.