आजरा : आजरा- भुदरगडचे प्रांताधिकारी यांची बदली झाल्याशिवाय उचंगी व सर्फनाला धरणाचे काम करू देणार नाही, असा इशारा आज (सोमवारी) धरणग्रस्तांनी दिला. उचंगी व सर्फनाला धरणग्रस्तांनी आजरा तहसील कार्यालयावर मोर्चा काढून हा इशारा दिला.
मोर्चाची सुरुवात शिवाजी पुतळ्यापासून झाली. ‘मोर्चात धरणग्रस्तांचे पुनर्वसन नाकारणाऱ्या प्रांताधिकाऱ्यांची बदली झालीच पाहिजे’, ‘पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बाप्पाचे’, ‘नही चलेगी... नही चलेगी... दादागिरी नही चलेंगी’, अशा घोषणा देण्यात आल्या. मोर्चाचे नेतृत्व संजय तर्डेकर, धनाजी गुरव, अशोक जाधव यांनी केले. धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत प्रांताधिकारी असंवेदनशील व बेजबाबदारपणाची भूमिका घेत आहेत. त्यामुळे धरणग्रस्तांचे पुनर्वसन रेंगाळले आहे. धरणग्रस्तांच्या प्रश्नांबाबत वारंवार लेखी व तोंडी माहिती देऊनही जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे. धरणग्रस्तांच्या पुनर्वसन कायद्याचा चुकीचा अर्थ लावून धरणग्रस्तांना पुनर्वसनापासून वंचित ठेवले जात आहे. अशा अधिकाऱ्यांवर धरणग्रस्तांचा विश्वास राहिला नाही. त्यामुळे प्रांताधिकाऱ्यांची तातडीने बदली करावी. अन्यथा उचंगी व सर्फनाला धरणाचे काम करू देणार नाही, असा निर्धार संजय तर्डेकर, धनाजी गुरव, अशोक जाधव यांनी व्यक्त केला. याला सर्वांनी हात वर करून मंजुरी दिली.
मोर्चात उचंगी, सर्फनाला धरण संघर्ष समितीचे संजय भडांगे, दत्तात्रय बापट, बाळासाहेब घेवडे, चंद्रकांत सांबरेकर, रणजित सरदेसाई, नामदेव फगरे यांच्यासह धरणग्रस्त सहभागी झाले होते. मोर्चा तहसील कार्यालयासमोर आल्यानंतर त्याचे सभेत रूपांतर झाले. मोर्चाच्या वतीने तहसीलदार विकास अहिर यांना निवेदन देण्यात आले.
------------------------------------------------------------------
* फोटो ओळी : उचंगी व सर्फनाला धरणग्रस्तांचा आजरा तहसील कार्यालयावर निघालेला मोर्चा. दुसऱ्या छायाचित्रात कार्यालयासमोर मोर्चेकऱ्यांसमोर बोलताना कॉ. संजय तर्डेकर. क्रमांक : ०८०२२०२१-गड-०८/०९