सैन्यभरती करा म्हणून तरुणांची फौज रस्त्यावर उतरली. कित्येक दिवसांनी गर्दीचा सागर पाहून नेत्यालाही चांगलाच चेव चढलेला, जिल्हाधिकाऱ्यांसमोर गेल्यानंतर ऐटीत प्रश्नांची सरबत्ती सुरू. त्यांनी सगळे ऐकून घेतल्यानंतर, एकाच वाक्यात भरतीची तारीख जाहीर करून टाकली. कधी एकदा बाहेर जातो आणि सांगतो, यासाठी भाऊ कासावीस... तेवढ्यात त्यांच्याच सोबत असलेल्या तरुणांनी मोबाईलवरून बाहेर सोडला मेसेज. गड जिंकल्याच्या अविर्भावात भाऊ चढले व्यासपीठावर.. पण बघताेय तर काय, सगळे घोडे पसार. नुसता ट्रॉलीरूपी टांगा तेवढाच हजर. नव्या पोरांच्या या तंत्राने नेत्याचा रुबाबही उतरला आणि मोर्चाही संपला.
पिवर भेळ...
सैन्य भरतीच्या निमित्ताने दुपारी तीव्र उन्हात मोर्चा निघाला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात येईपर्यंत भुकेने कावळे ओरडत होते. ज्या रस्त्यावर या पोरांनी ठिय्या मारला, त्याच्या बाजूलाच खाऊचे गाडे होते. त्याच्या घमघमाटाने कधी एकदा सभा संपतेय आणि ताव मारतोय असे झाले होते. पोरांमध्ये चुळबूळ. निवेदन देण्यासाठी शिष्टमंडळ आत गेल्याचे बघितले आणि सगळे सुसाट... मग काय, सपशेल फडशाच...