कोल्हापूर : महापालिका क्षेत्रात मे महिन्यात तब्बल १० हजार ७२५ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली, तर २५१ व्यक्तींचा मृत्यू झाला. एका महिन्यात इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण आढळून आल्यामुळे प्रशासनाच्या प्रयत्नांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एकीकडे प्रशासन चाचण्यांची संख्या वाढविल्यामुळे रुग्णसंख्या वाढल्याचे सांगत असले तरी कोरोना संसर्गाने शहराला विळख्यात घेतले आहे, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.
कोल्हापूर महापालिका प्रशासन कोरोना संसर्गाला रोखण्याचे कसून प्रयत्न करत आहे, असा दावा केला जातो. परंतु संसर्ग कमी होण्याऐवजी तो वाढत असल्याचे दिसून येत आहे. एकट्या मे महिन्यात १० हजार ७२५ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली, तर २५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एप्रिल महिन्यात ५४४७ नवीन रुग्ण आढळून आले होते. त्याच्या तुलनेत मे महिन्यातील रुग्णसंख्या दुप्पट झाली आहे.
गृह अलगीकरण, कॉन्टक्ट ट्रेसिंगमध्ये दाखविलेला हलगर्जीपणा यामुळे कोल्हापूर महापालिका हद्दीतील रुग्णसंख्या वाढली आहे. कोरोनाच्या पहिल्या साथीवेळी प्रशासनाने जी तयारी केली होती, त्याच्या तुलनेत दुसऱ्या साथीच्या वेळी कोरोनाला रोखण्याचे उशिरा सुरू झालेले प्रयत्न हेही रुग्णसंख्या वाढीला कारणीभूत आहे. रुग्ण वाढतील तशी कोविड सेंटर सुरू करण्याचा प्रशासनाचा निर्णय, तसेच गृह अलगीकरणात असलेल्या रुग्णांकडून नियमांचे पालनाकडे झालेले दुर्लक्ष यामुळेही रुग्णवाढीस हातभार लागला.
मे महिन्यात महापालिका प्रशासनाने कोरोना चाचण्यांची संख्या वाढविली आहे. संजीवनी अभियान राबवून घरोघरी जाऊन रुग्ण शोधमोहीम सुरू केली. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढल्याचा दावा महापालिका प्रशासन करत आहे. त्यांचा हा दावा खरा मानला तरी रुग्णसंख्या वाढत आहे, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. गृह अलगीकरणातील रुग्णांवर प्रभाग सचिव पातळीवर योग्य नियंत्रण राहिले नाही, हेही वास्तव आहे.