लोकमत न्यूज नेटवर्क
कसबा बावडा: कसबा बावड्यातील लाइन बझार प्रभाग क्रमांक चारमध्ये सध्या कचरा उठावाची समस्या गंभीर बनली आहे. त्यामुळे साचलेला कचरा कुठे टाकायचा, असा सवाल आता नागरिक करू लागले आहेत. कचरा उठाव करण्यासाठी यंत्रणा मिळत नसल्यामुळे, या प्रभागात वेळेवर कचरा उठाव होत नाही. परिणामी, कचरा साठून राहिल्याने अस्वच्छता पसरली आहे. मागील आठवड्यात दोन दिवस घंटागाडी बंद असल्यामुळे लोकांना कचरा कुठे टाकायचा, असा प्रश्न भेडसावू लागला होता. झाडू कामगारांनी काढलेला कचरा, पालापाचोळा, गाळ, कटिंग याचे प्रमाण प्रभागांमध्ये जास्त आहे. एका टिपरमध्ये प्रभागातील सर्व कचऱ्याचा उठाव होत नाही. यामुळे या प्रभागात नवी गाडी उठाव करण्यासाठी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.
चौकट : प्रभाग क्रमांक चारमध्येच कचरा उठावाची समस्या असताना, येथील कोंडाळ्यामध्ये प्रभाग क्रमांक दोनमधील नागरिक कचरा आणून टाकतात. त्यामुळे येथील कचरा उठाव करताना यंत्रणेवर ताण पडत आहे.
कोट : कचऱ्याचा वेळेवर उठाव होत नसल्याच्या तक्रारी आहेत. आरोग्य निरीक्षक यांच्याकडे पुरेशी यंत्रणा नसल्यामुळे त्यांनाही मर्यादा येतात. घंटागाडी, आरसी गाडी, जेसीबी, डम्पर या गाड्या जेव्हा गरज असते, तेव्हा उपलब्ध नसतात. त्यामुळे कचरा उठाव केला जात नाही.
माधुरी संजय लाड, माजी नगरसेविका