कोल्हापूर : महाविद्यालय सोडल्याचा दाखला (ट्रान्स्फर सर्टिफिकेट-टी. सी.) मिळत नसल्याच्या कारणावरून शिवाजी पेठ परिसरातील एका कॉलेजमधील विद्यार्थ्याने शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा विभागात गुरुवारी दुपारी गोंधळ घातला. तसेच राग अनावर झाल्याने त्याने डिजिटल युनिव्हर्सिटी डिजिटल कॉलेज (डीयूडीसी) या कक्षाच्या प्रवेशद्वाराची काच लाथ घालून फोडली. यात विद्यापीठाचा सुरक्षा रक्षक किरकोळ जखमी झाला. संबंधित विद्यार्थ्याच्या कृत्याची विद्यापीठ वर्तुळात दिवसभर जोरदार चर्चा सुरू होती.बी. कॉम.च्या द्वितीय वर्षात शिकणारा संबंधित विद्यार्थी टी. सी. मिळविण्यासाठी दुपारी बाराच्या सुमारास विद्यापीठाच्या परीक्षा भवन एकमध्ये आला. त्याने भवनच्या पहिल्या मजल्यावरील ‘डीयूडीसी’चा कक्ष गाठला. शिवाय कक्षात असलेले उपकुलसचिव जी. आर. पळसे यांना भेटण्यासाठी आत जाण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी परीक्षाविषयक गोपनीय कामकाज चालत असल्याने विद्यापीठाचे सुरक्षा रक्षक मोहन पाटील यांनी त्याला कक्षाच्या प्रवेशद्वारात रोखले. शिवाय उपकुलसचिव पळसे हे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी असलेल्या खिडकीतून तुझ्याशी बोलतील, असे सांगितले. यावर संबंधित विद्यार्थ्याने त्यांना बाहेर बोलवा, नाही तर मला आत सोडा, अशी आक्रमक भूमिका घेतली. सुरक्षेचा प्रश्न असल्याने सुरक्षा रक्षक पाटील यांनी त्याला आत सोडले नाही. त्यावर रागाच्या भरात संबंधित विद्यार्थ्याने कक्षाच्या दरवाजावर लाथ मारली. यात दरवाजाची काच फुटली. अचानक घडलेल्या प्रकारामुळे या ठिकाणी निकालातील दुरुस्ती तसेच अन्य कामकाजासाठी आलेले विद्यार्थी, पालकांचा गोंधळ उडाला. तसेच काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरवाजावर लाथ मारून पळून निघालेल्या संबंधित विद्यार्थ्याला सुरक्षा रक्षक व परीक्षा विभागातील कर्मचाऱ्यांनी पकडले. तसेच त्याला परीक्षा नियंत्रकांच्या कक्षात बसवून ठेवले. विद्यापीठ कायदा आणि नियमानुसार त्याच्यावर कारवाई करण्यात आली. (प्रतिनिधी)जबाबदारी झटकण्याचा परिणामपरीक्षा अर्ज जनरेट होत नाही, जा विद्यापीठात; इ-फॉरमॅटमधील टी. सी. मिळत नाही, जा विद्यापीठात; असा सल्ला सध्या विद्यापीठ कार्यक्षेत्रातील काही महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांना दिला जात आहे. आपल्यावरील जबाबदारी झटकून काही महाविद्यालये विद्यार्थ्यांना पुढे करतात. महाविद्यालयांच्या या जबाबदारी झटकण्याचा परिणाम संबंधित विद्यार्थ्याच्या गोंधळ घालण्याच्या क्रियेतून स्पष्ट झाला आहे. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना पुढे करून जबाबदारी झटकणाऱ्या महाविद्यालयांना वेळीच सूचना देण्याची कार्यवाही विद्यापीठाने करण्याची अपेक्षा काही अधिकारी, कर्मचाऱ्यांनी व्यकत केली.
‘टी.सी.’साठी विद्यार्थ्याचा शिवाजी विद्यापीठात गोंधळ
By admin | Updated: August 28, 2015 00:05 IST