चंदगड/प्रतिनिधी: मौजे पार्ले (चंदगड) येथे पूर्वापार चालत आलेल्या वहिवाटीखालील पाणंद रस्ते आडवणूक करणाऱ्या शेतकर्यावर कारवाई करावी,
अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार विनोद रणवरे यांना देण्यात आले आहे
निवेदनात म्हटले आहे की गट नं. ५१/१ मधील जमिनितून शिवारातील, वाड्या-वस्त्यांवर जाण्या-येण्यासाठी पाणंद रस्त्याची नोंद आहे पण या पाणंद रस्त्यांवर अतिक्रमण करून हे पाणंद आडवण्यात आले आहेत तसेच याच जमिनीतून पार्ले गावाला पाणीपुरवठा करणारी नळपाणी योजना कार्यान्वित आहे. या नळपाणी योजनेचीही या शेतकऱ्यांनी दोन-तीनवेळा मोडतोड केलेली आहे. नळपाणी योजना व पाणंद रस्ते दुरूस्त करून मिळावेत, अशी मागणी ग्रामसभेच्या ठरावाद्वारे पंचायत समितीकडे केली, त्यानुसार नळपाणी व रस्तेही दुरूस्ती केलेले आहेत पण परंतु गट नं. ५१/१ च्या जमीन मालकांनी जाण्या-येण्याचा गावकऱ्यांचा हक्कसंबंध डावलून व निव्वळ त्रास देण्याच्या हेतूने चंदगड न्यायालयात दावा दाखल केला आहे. त्यामुळे गट. नं ५१/१ मधील झालेल्या ग्रा. पं. नोंदीच्या रस्त्याबरोबर सदर क्षेत्रांतून जाणारे व अन्य पाणंद रस्ते व गावाला जोडणारे रस्ते दुरूस्त करून मिळावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर तंटामुक्त अध्यक्ष गोविंद मालू गावडे, महादेव मयेकर, दत्ता फाटक, मारुती कांबळे, लक्ष्मण गावडे, जिवणू गावडे, संभाजी गावडे, विठोबा मयेकर, तुकाराम गावडे, विठ्ठल गावडे, रामू देवळी, अजय कांबळे, अशोक सुतार, विठ्ठल जानकर, शंकर मयेकर आदींसह ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.