जयसिंगपूर : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी, तसेच केंद्र सरकारला सुबुद्धी येऊ दे, या मागणीसाठी आज, गुरुवारी रात्री आठपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कार्यकर्त्यांसमवेत रात्रभर आत्मक्लेश जागर आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी दिली.
केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांच्यावर लादलेले तीन कृषी कायदे अन्यायी असून, शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे आहेत. दिल्लीत सात दिवसांपासून कडाक्याच्या थंडीत देशभरातील शेतकरी कुडकुडीत बसले आहेत. तरीही केंद्र सरकार केवळ वेळकाढूची भूमिका घेत आहेत. त्या शेतकऱ्यांना पाठिंबा म्हणून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे जागर आंदोलन करण्यात येणार आहे. रात्री पिठलं भाकरं खाऊन या आंदोलनाला सुरुवात केली जाणार आहे. रात्रभर भजन आणि कीर्तन केले जाणार आहे. सरकारला सुबुद्धी दे व शेतकऱ्यांना न्याय मिळू दे, या मागणीसाठी आत्मक्लेश जागर आंदोलन केले जाणार असल्याचेही शेट्टी यांनी सांगितले.