कोल्हापूर : ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांचे स्वॅब तातडीने घेतले जात नसल्याची दखल जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी घेतली आहे. याबाबत रविवारच्या बैठकीत सांगोपांग चर्चा झाल्यानंतर हाय रिस्क व्यक्तींचे स्वॅब त्याच दिवशी घ्यावेत अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने यांनी दिल्या आहेत.
माने यांनी सर्व पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी आणि तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना याबाबत सोमवारी लेखी पत्र पाठविले. त्यामुळे यापुढच्या काळात हाय रिस्कमधील नागरिकांचे स्वॅब घेण्याची प्रक्रिया वेगावणार आहे.
पॉझिटिव्ह रुग्णांची यादी अहवाल आल्यानंतर त्याच दिवशी गटविकास अधिकारी आणि तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना पाठविण्यात येते. परंतु त्यानंतर संबंधित पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील नातेवाईक, मित्रमंडळी यांचे कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग तितक्या प्रभावशाली पध्दतीने होत नसल्याचे दिसून आले आहे. कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग झाल्यानंतरच हाय रिस्कमधील नागरिकांची संख्या निश्चित होते. यानंतर तातडीने त्यांचे स्वॅब दिले तरच संभाव्य कोरोना प्रसाराला आळा घालणे शक्य होते. मात्र, गतवर्षीप्रमाणे यावर्षी ही सर्व प्रक्रिया तेवढ्या परिणामकारक होत नसल्याबाबत निरीक्षण नोंदविण्यात आले. त्यामुळेच जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जिल्हा परिषदेला सूचना केल्या. त्यानुसार हे पत्र पाठविले असून त्याच दिवशी हायरिस्कमधील नागरिकांचे स्वॅब घेऊन तालुका आरोग्य अधिकारी यांनी पोर्टलवर डाटा एन्ट्री करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
चौकट
वाहन व्यवस्था करण्याच्या सूचना
पॉझिटिव्ह रूग्णाच्या संपर्कातील व्यक्तीचे स्वॅब घेण्यासाठी संबंधितांना ने-आण करण्याची व्यवस्था तालुका आरोग्य अधिकारी व संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी करायची आहे. तशा सूचनाही या पत्रात देण्यात आल्या आहेत.
कोट
जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णसंख्येचा आढावा घेतला तर सर्वच तालुक्यात रुग्णसंख्या वाढत असल्याचे चित्र आहे. संसर्ग रोखण्यासाठी हाय रिस्कमधील नागरिकांचे तातडीने स्वॅब घेणे आवश्यक आहे. म्हणूनच याबाबत गटविकास अधिकारी आणि तालुका आरोग्य अधिकारी यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
अजयकुमार माने
मुख्य कार्यकारी अधिकरी, जिल्हा परिषद कोल्हापूर