लाेकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयातील एका न्यायमूर्तींचे निधन झाल्याने सोमवारी ‘गोकुळ’ निवडणुकीबाबत होणारी सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे आज, मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून मतदानासाठी अवघे पाच दिवस उरल्याने निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने अशा पार्श्वभूमीवर ‘गोकुळ’ची निवडणूक घेणे योग्य नाही, असे सत्तारूढ गटाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर सुनावणी होऊन सोमवारी राज्य सरकारला म्हणणे मांडण्याचे आदेश दिले हाेते. राज्य सरकारने आपले म्हणणे तयार केले आहे. मात्र, सोमवारी एका न्यायमूर्तीचे निधन झाल्याने न्यायालयीन कामकाजास सुट्टी होती. त्यामुळे सुनावणी होऊ शकली नाही. आज, यावर सुनावणी होणार असून न्यायालय निकाल काय देते याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
‘गोकुळ’साठी रविवारी (दि. २) मतदान होत आहे. मतदानासाठी अवघे पाच दिवस तर प्रचारासाठी चारच दिवस राहिल्याने निकालाबाबत उत्सुकता आहे.