कागल : दुष्काळाच्या झळा पुढील वर्षीही कागल तालुक्यातील साखर कारखान्यांना जाणवणार आहेत. कारण शेतीसाठी निर्माण झालेल्या पाणीटंचाईमुळे दरवर्षीच्या तुलनेत जवळपास आठ हजार एकरांतील ऊस पीक कमी झाले आहे. नुकत्याच संपलेल्या ऊस गळीत हंगामात तालुक्यात २१ हजार ६०० हेक्टर उसाचे क्षेत्र होते. मात्र, पुढील वर्षासाठी ते १८ हजार १२० हेक्टर इतकेच असेल.चालू वर्षी निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे कागल तालुक्यात पिण्याच्या पाण्याची फारशी टंचाई जाणवलेली नाही. चिकोत्रा नदीवरील उपसाबंदी आणि आता वेदगंगा नदीवर केलेल्या उपसाबंदीनंतरही दूधगंगा नदीतून शेतीला पाणीपुरवठा सुरू आहे. सध्याची ही परिस्थिती जरी भीषण वाटत नसली तरीही पाणीटंचाईचा फटका पुढच्यावर्षी बसणार आहे. साधारणत: आठ हजार एकरांत सरासरी चाळीस टनाने ऊस उत्पादन गृहीत धरले तर तालुक्यात तीन लाख मे. टन उसाची घट पुढील हंगामात दिसणार आहे. तीन लाख मे. टन ऊस गाळपास कमी पडणे म्हणजे एका साखर कारखान्याचा निम्मा हंगाम कमी होण्यासारखा आहे. याचा फटका तालुक्यातील चारही साखर कारखान्यांना बसणार आहे. त्यांना तालुक्याबाहेरून ऊस आणून ही भरपाई करावी लागणार आहे. नोव्हेंबर-डिसेंबरपासून ऊस व अन्य पिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागले आहे. १ जानेवारी २०१६ पासून चिकोत्रा नदीवर उपसाबंदी, तर आता वेदगंगा नदीवर उपसाबंदी आहे. सुदैवाने दूधगंगा नदीवरही उपसाबंदी नाही. मात्र, दुष्काळी परिस्थितीने जमिनीतही पाणीसाठा कमी झाल्याने विहिरी, इंधन विहिरी यांनीही तळ गाठला आहे. परिणामी शेतीला पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही. यामुळेही उसाच्या पिकाला फटका बसला. म्हणून अनेक शेतकऱ्यांनी कमी कालावधीची पिके घेत पुढील वर्षीही दुष्काळाचा धोका नको म्हणून ऊस लागण करणेच टाळले आहे. त्यातून तीन हजार दोनशे हेक्टर क्षेत्रात ऊस पीक घटले आहे. म्हणून चालू वर्षीच्या दुष्काळाच्या झळा पुढील ऊस गळीत हंगामात जाणवणार आहेत, हे यातून स्पष्ट होते. उसाचे क्षेत्र घटण्याचे प्रमाण चिकोत्रा खोऱ्यात सर्वाधिक आहे. तालुक्यातील उसाची सद्य:स्थितीकृषी विभागाने केलेल्या नोंदीनुसार कागल तालुक्यात नुकत्याच झालेल्या ऊस गळीत हंगामात (सन २०१५-२०१६साठी) २१ हजार ६०० हेक्टर क्षेत्रात ऊस उपलब्ध होता. आता हंगाम संपल्यानंतर केलेल्या पाहणीत हे क्षेत्र १८ हजार १२० हेक्टर इतके राहिले आहे. त्यामध्ये खोडवा ८२८५ हेक्टर क्षेत्रात, पूर्व हंगामी लागण - ६००७ हेक्टरमध्ये सुरू लागण ३७१२ हेक्टरमध्ये तर आडसाली लागण फक्त ८१६ हेक्टरमध्ये झाली आहे. पुढील २०१६-१७ हंगामात ही टंचाई दिसणार आहे.साखर कारखान्यांच्या प्रयत्नानंतरहीकागल तालुक्यात पुढील हंगामासाठी जवळपास तीन लाख मे. टन उसाची कमतरता भासणार आहे. याचा फटका तालुक्यातील साखर कारखान्यांना बसणार आहेच, मात्र नगदी उत्पन्न देणारे पीक कमी झाल्याने कोट्यवधी रुपयांचा फटका शेतकरी वर्गाला बसणार आहे. ही परिस्थिती उद्भवू नये म्हणून छ. शाहू साखर कारखाना, सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना, सदाशिवराव मंडलिक साखर कारखाना यांनी पाणीटंचाई भागातील ऊस लवकर उचलण्यास प्राधान्य दिले. ठिबक सिंचन आणि इतर योजना जाहीर करून ऊस उत्पादकांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही उसाचे क्षेत्र घटले आहे.
पुढील हंगामात उसाचे क्षेत्र घटणार
By admin | Updated: May 23, 2016 00:20 IST