नगरपालिका विषय समित्यांच्या निवडी
अतुल आंबी
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : नगरपालिका विषय समित्यांच्या निवडीवरून ढवळून निघालेल्या राजकीय परिस्थितीतून आवाडे-हाळवणकर-कारंडे या तिघांना सत्ता समीकरणे जुळविण्यात यश आले; परंतु गेल्या वर्षभरात एकत्र असूनही पालिकेचा कारभार सुधारण्यात मात्र हलगर्जीपणा झाला आहे. येत्या वर्षभरात पुन्हा नव्याने निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे यावर्षीचा कारभार महत्त्वाचा ठरणार आहे.
नगरपालिकेतील कारभाराविषयी शहरवासीयांत तीव्र संतप्त भावना निर्माण झाल्या आहेत. त्याचा फटका माजी आमदार सुरेश हाळवणकर यांना विधानसभा निवडणुकीत बसला. हाळवणकर यांनी विशेष रस्ते अनुदानातून १०७ कोटी रुपयांचे रस्ते खास इचलकरंजी शहरासाठी मंजूर करून आणूनही त्याचा योग्यवेळी फायदा करून घेता आला नाही. त्याला नगरपालिकेचा कारभारच जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर गतवर्षी नगरपालिकेतील सत्ता समीकरणे बदलून नव्याने आवाडे व कारंडे यांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करण्यात आली. तीच सत्ता कायम ठेवण्यात तिघांना यावर्षीही यश मिळाले. त्यामध्ये आमदार प्रकाश आवाडे यांनी आमदारकीच्या माध्यमातून कामे करून आणण्यासाठी नगरपालिका सत्तेत राहणे आवश्यक आहे, असे म्हणत ताराराणी आघाडीला हाताशी धरून राजकीय खेळी करत वजनदार खाते आपल्या पारड्यात पाडून घेतले. हाळवणकर यांनी नगरपालिकेच्या कारभारावर आगामी निवडणुकीत आसूड ओढला जाणार आहे. त्यामुळे त्याला सर्वच घटक जबाबदार राहतील, याची दक्षता घेत सावधगिरीने सत्तेत आवाडे-कारंडे या दोघांना सहभागी करून घेतले तर कारंडे यांना बाजूला करून ताराराणी आघाडीशी समीकरणे जुळण्याची शक्यता असल्याने योग्य निर्णय घेत मदन कारंडे यांनी तडजोडीची भूमिका घेऊन सत्तेत सहभाग टिकवला. त्यामुळे तिघांचीही राजकीय खेळी यशस्वी बनली.
चौकटी
कारभार सुधारणार की....
प्रवाहात हात धुऊन घेणे, अशा प्रवृत्ती बाजूला ठेवून प्रामाणिक व निष्ठावंत व्यक्तीच्या हातात एकहाती कारभार दिल्याशिवाय नगरपालिकेच्या कारभारात सुधारणा होणार नाही. त्यामुळे या अखेरच्या वर्षी तिघांकडून काही ठोस हालचाल केली जाते का, पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या...’ हे महत्त्वाचे ठरणार आहे.
जांभळे गटाचे अस्तित्व अस्पष्ट
विरोधी बाकावर असले तरी सागर चाळके, प्रकाश मोरबाळे हे आपल्या ताराराणी आघाडीचे तसेच शशांक बावचकर हे कॉँग्रेसचे अस्तित्व टिकवून ठेवून सत्ताधाऱ्यांना व प्रशासनाला वेळोवेळी धारेवर धरतात. परंतु सत्तेच्या ‘समीकरणा''तून बाहेर पडलेल्या जांभळे गटाचे मात्र अस्तित्व अस्पष्ट झाले आहे.