कोल्हापूर : स्पर्धा परीक्षेची तयार करताना, परीक्षार्थी, विद्यार्थ्यांनी यश-अपयशाचा विचार न करता स्वयंअध्ययनावर भर द्यावा, चांगल्या लेखकांची पुस्तके वाचावीत, या काळात विद्यार्थ्यांना कुटुंबीयांकडून मानसिक आधाराची गरज महत्त्वाची असते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव विकास खारगे यांनी मंगळवारी येथे केले. शिवाजी विद्यापीठाच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातर्फे आयोजित ‘स्पर्धा परीक्षांसाठीची तयारी’ या चार दिवसीय ऑनलाइन व्याख्यानमालेच्या प्रारंभी ते बोलत होते. व्याख्यानमालेचे उद्घाटन कुलगुरू डॉ.डी.टी. शिर्के यांच्या हस्ते झाले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ.पी.एस. पाटील प्रमुख उपस्थित होते.
स्पर्धा परीक्षांच्या तयारीची सुरुवात शालेय जीवनापासूनच करावी लागते. शासकीय सेवेसाठी स्पर्धा परीक्षा महत्त्वपूर्ण असतात. त्यासाठी मुळातूनच आवड असणे गरजेचे आहे. समाजसेवा हेच शासकीय सेवेचे प्रथम आणि अंतिम उद्दिष्ट असते; असले पाहिजे, असे विकास खारगे यांनी सांगितले. सध्याच्या ऑनलाइन युगामध्ये वावरताना शिवाजी विद्यापीठाचे विविध उपक्रम राज्यभरातील विद्यार्थ्यांपर्यंत विस्तारायला हवेत. त्याचा लाभ सर्वदूर पसरलेल्या विद्यार्थी वर्गाला व्हायला हवा. उत्तम नियोजन आणि कठोर परिश्रमाने विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेस सामोरे जावे, असे आवाहन डॉ.शिर्के यांनी केले. केंद्राचे समन्वयक डॉ.पी.एस.कांबळे यांनी प्रास्ताविक केले. अजय कुंभार यांनी आभार मानले.
अविश्रांत प्रयत्न
शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना विविध परीक्षांची तयारी करावी लागते. स्पर्धा परीक्षांची तयारी करताना, विद्यार्थ्यांनी पूर्ण यश मिळविण्यासाठी अविश्रांत प्रयत्न केले पाहिजेत, असा सल्ला डॉ.पाटील यांनी दिला.
फोटो (२२०९२०२१-कोल-विकास खारगे (विद्यापीठ)
220921\22kol_5_22092021_5.jpg
फोटो (२२०९२०२१-कोल-विकास खारगे (विद्यापीठ)