सांगली : चालू ऊस हंगामातील पहिली उचल ‘एफआरपी’प्रमाणे एकरकमी मिळावी, या मागणीसाठी आज (शनिवार) शेतकरी संघटनेच्यावतीने साखर कारखान्यावर दुचाकी रॅली काढून निदर्शने करण्यात आली. आंदोलनाचे नेतृत्व शेतकरी संघटनेचे युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संजय कोले यांनी केले.याबाबत साखर कारखान्यांच्या अध्यक्षांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शेतकऱ्यांना सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांना ऊस घातला असून, त्याची पहिली उचल शासनाने जाहीर केलेल्या एफआरपीप्रमाणे एकरकमी मिळावी, अशी मागणी आहे. सांगली जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांनी ती प्रतिटन १९०० प्रामाणे देणे सुरू केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी किमान अडीच हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त पहिली उचल देणे चालू केले आहे. एफआरपीपेक्षा कमी दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले आहे. यापुढे एफआरपीप्रमाणे दर देण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. रॅलीची सुरुवात गणपती पेठेतील शेतकरी संघटनेच्या कार्यालयापासून करण्यात आली. रॅली हरभट रोड, मार्केट यार्डमधील यशवंतनगर साखर कारखान्याच्या कार्यालयात निवेदन देण्यात आले. त्यानंतर ही रॅली वसंतदादा साखर कारखान्यावर नेण्यात आली. आंदोलनात शीतल राजोबा, अशोक चौगुले, बालेखान मुजावर, बाबासाहेब हाके, गुंडा माळी, यशवंत कवठेकर, मुसा देसाई, अलाउद्दीन जमादार, जयसिंग सावंत, आलम जमादार यांच्यासह शेतकरी, कार्यकर्ते आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
‘एफआरपी’साठी धडक मोर्चा
By admin | Updated: January 11, 2015 00:38 IST