कोल्हापूर : शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. यामुळे शासनाच्या आदेशानुसार रविवारच्या रात्री १२ ते १ जून रोजी सकाळी सातपर्यंत काही अत्यावश्यक सेवा वगळता, कडक निर्बंधच राहतील, असे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी एका आदेशाद्वारे स्पष्ट केले.
आदेशात म्हटले आहे, किराणा सामान, भाजीपाला दुकाने, फळविक्रेते, दूध डेअरी, बेकरी आणि सर्व खाद्यदुकाने, कृषीविषयक सेवा सकाळी सात ते सकाळी ११ वाजेपर्यंत सुरू राहतील.
या दुकानांत ‘मास्क नाही - प्रवेश नाही,’ ‘सामाजिक अंतर नसेल तर वितरणही नाही,’ या आदेशाचे काटेकोरपणे पालनाच्या तपासणीसाठी विशेष पथके नेमावीत. नियमांचे उल्लंघन होत असल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी. विक्रेत्यांकडून वारंवार नियमांचे उल्लंघन होत असल्यास संबंधित दुकाने कडक निर्बंध जोपर्यंत लागू आहेत, तोपर्यंत बंद करण्यात यावीत.