कोल्हापूर : जिल्ह्यातील ग्रामिण भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने गावागावात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार, असा इशारा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिला. दोन दिवसात जिल्ह्यातील पोलीस बंदोबस्ताचे नव्याने नियोजन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील कोरोना वाढत्या रुग्णसंख्येचा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी आढावा घेतला. कोरोना प्रतिबंधात्मक उपायांची कडक अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत नवी रुग्ण संख्या आटोक्यात येणार नाही. त्यामुळे पोलिसांनी अधिक कडक कारवाई करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर कठोर कारवाई कराव्यात, असेही सुनावले. त्या पार्श्वभूमीवर येत्या दोन दिवसात नव्याने पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करून शहर व गावागावात उपाययोजनांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचे अधीक्षक बलकवडे यांनी सांगितले. मास्क न वापरणे, विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर दंडात्मक आणि वाहन जप्तीची कारवाई करणार असल्याचे सांगितले.