आजरा : इटे (ता. आजरा) येथील रास्तभाव धान्य दुकानदार मंगल शिवाजी कांबळे अंत्योदय व अन्न सुरक्षा लाभार्थ्यांचे धान्य परस्पर काळ्या बाजारात विकत असल्याचा आरोप करीत इटे ग्रामस्थांनी तहसीलदारांना २२ डिसेंबरला तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणासह ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला आहे.गेले १३ दिवस मुक्ती संघर्ष समितीचे आजरा तहसीलसमोर दाभिल येथील रास्तभाव धान्य दुकानदाराचा परवाना रद्द करावा यासाठी आंदोलन सुरू आहे. पाठोपाठ इटे ग्रामस्थांनी दिलेला इशारा ‘महसूल’ विभागाची डोकेदुखी ठरत आहे.इटेच्या पार्श्वभूमीवर बोलताना सरपंच विलास पाटील म्हणाले, गावातील अन्य दुकानदारांबाबत ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. या धान्य दुकानदाराच्या धान्य वितरणामध्ये अनेक त्रुटी आहेत. ग्रामस्थांच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार श्रीमती शिल्पा ठोकडे यांनी ८ डिसेंबरला दुकानास भेट देऊन शिधापत्रिकाधारकांशी थेट संवाद साधला होता. यावेळी धान्य वितरणात अनेक त्रुटी आढळल्या. माहे नोव्हेंबरचे धान्य अनेक शिधापत्रिका धारकांना मिळालेले नाही. दुकानदार कांबळे यांना कार्डधारकांबाबत कोणतीही माहिती नाही.ग्रामस्थांच्या तक्रारींचा विचार करून रास्त धान्य दुकानदारावर कारवाई करून परवाना रद्द करावी, अशी मागणी केली. यावेळी शिवाजी पाटील, महादेव पाटील, संजय शेणवी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
इटे ग्रामस्थ करणार ठिय्या आंदोलन
By admin | Updated: December 14, 2014 23:52 IST