राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : नैसर्गिक संकटामुळे शेतकरी हैराण झाला असला तरी त्याला विमा कंपन्यांकडून भरपाईपेक्षा मनस्तापच अधिक मिळतो. जाचक निकषामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी वंचित राहत असून अनेक वर्षे निकष बदलण्याची मागणी करूनही बदल होत नाही. त्यामुळेच एकूण खरीप क्षेत्राच्या अवघ्या ०.७२ टक्के क्षेत्राचा पीक विमा यंदा शेतकऱ्यांनी उतरला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची उत्पादकता तुलनेत अधिक आहे. त्यात विमा कंपन्यांच्या निकष अधिक जटिल असल्याने येथील शेतकरी विमा योजनेत सहभागी होत नाहीत. प्रत्येक वर्षी विमा हप्त्यापेक्षा मिळणारी भरपाई खूपच कमी असते. त्यामुळे विमा कंपन्यांचे दुकान भरण्यासाठी पीक विमा उतरायचा का, असा सवाल शेतकरी विचारत असून लाभच मिळणार नसेल तर मग सहभागी कशाला व्हायचे? यासाठी ते पाठ फिरवत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात ऊस वगळता २ लाख ४ हजार हेक्टर खरिपाचे क्षेत्र आहे, त्यापैकी यंदा केवळ १,४८४ हेक्टरवरील पिकांचा विमा आहे.
दृष्टिक्षेपात जिल्ह्यातील शेती -
खरीप गावे - १,२९३
खरिपाचे क्षेत्र - ३ लाख ९३ हेक्टर
ऊस वगळता - २ लाख ४ हजार २२४ हेक्टर
अत्यल्पभूधारक - ५ लाख ४ हजार ११७
अल्पभूधारक - १ लाख ५ हजार ४९२
सरकारच्या पीक विमा योजनेत सहभागी शेतकरी - ४,५६९
विमाधारक क्षेत्र - १,४८४ हेक्टर
एकूण खरीप क्षेत्र हेक्टर -
पीक क्षेत्र
भात ९३ हजार ७४२
ज्वारी २ हजार ३३७
नागली १८ हजार ७८४
भुईमूग ३९ हजार १७६
सोयाबीन ४१ हजार ५३८
मका १ हजार ९५५
तूर १ हजार ८२
मूग १ हजार ७०
उडीद १ हजार ५७
तालुकानिहाय विमा उतरलेले क्षेत्र व शेतकरी
तालुका क्षेत्र हेक्टर शेतकऱ्यांची संख्या
आजरा ५०.४६ २३०
गगनबावडा १४.५४ ९९
भुदरगड ४१.६१ २४८
चंदगड ४२.०६ १२९
गडहिंग्लज ५१.३६ २२७
हातकणंगले १६८ ४७६
कागल १२४.७२ ४०७
करवीर ७४.८२ २०१
पन्हाळा १३४.९९ ४५७
राधानगरी ४४.६९ २३०
शाहूवाडी ५२.६६ ३२८
शिरोळ ७११.४२ १५३७
कोट-
जिल्ह्यात महापुरामुळे उसाचे मोठे नुकसान झाले; मात्र ऊस विमा योजनेत नाही. त्यामुळे सोयाबीन, भुईमूग हीच पिके राहिली. या पिकांना लाभ देतानाही विमा कंपन्यांचे निकष आडवे येतात. त्यामुळे सरकारने निकष न बघता, शेतकऱ्यांना मदत कशी होईल, हे पाहावे.
- अमोल नांद्रेकर (शेतकरी, कवठेसार)