कोल्हापूर: चालण्यासारखा दुसरा व्यायाम नाही, हे कळतंय पण वळत नाही अशी परिस्थिती आहे. हातात गाडी आल्यापासून लोक चालणेच विसरले आहेत, त्याचे व्हायचे तेच परिणाम दिसत आहेत. नको त्या वयात हाडांची दुखणी शरीराला जखडली आहेत. हातापायांना व्यायामच नसल्याने स्थूलता वाढून अस्थिराेगांना आयते निमंत्रणच मिळत आहे.
अलीकडे हातात दुचाक्यांचे हॅण्डल आणि चारचाकीचे स्टेअरिंग आल्यापासून किक आणि स्टार्टर मारण्यापर्यंतच हातापायांची हालचाल सीमित राहिली आहे. जे आरोग्यादृष्टीने जागरूक आहे, ते भल्या पहाटे आणि संध्याकाळी सायकलिंगसह वेगाने चालण्याचे व्यायाम करतात. पण त्यांची एकूणच संख्या पाहता बरीच मोठी लाेकसंख्या मिळणारा रिकामा वेळ एक तर टीव्ही पाहण्यात, झोपण्यात, गप्पा मारण्यात घालवताना दिसते. जेवणे आणि झोपणे यातून नुसताच स्थूलपणा वाढत आहे. मग जाड झाला आहे, असे कुणी म्हटले की फिरायला जाण्याचे, व्यायाम करण्याचे संकल्प सोडले जातात, पण तेही नव्याचे नऊ दिवस याप्रमाणे लगेचच बंद पडतात. लठ्ठपणा आहे तसाच राहतो. कमी अधिक प्रमाणात समाजातील सर्वच घटकांत हे चित्र आहे. लठ्ठपणा वाढल्याने साहजिकच त्याचा ताण एकूण शरीरावर येतो. शरीराच्या सर्वच हालचाली मंदावतात. यातून हाडांची दुखणे डोके वर काढू लागतात. हाडांमध्ये मजबुती राहत नाही, त्यामुळे साधा पाय मुरगळला तरी ते फॅक्चरपर्यंत जात आहे, आणि त्याच्या खर्चाचा भुर्दंड सोसावा लागत आहे.
याच कारणासाठी होतेय चालणे
ज्येष्ठ नागरिक : व्यायाम म्हणून सकाळ व संध्याकाळ
महिला: किराणा दुकानापर्यंत किंवा रिक्षा, बसस्टॉपपर्यंत
पुरुष: गाडी लावून घरात किंवा कार्यालयात जाईपर्यंत
तरुणाई: गल्लीतील मित्रमैत्रिणींच्या घरापर्यंत
म्हणून वाढले हाडांचे आजार
हाडे ठिसूळ होणे हा चालणेच बंद केल्याचा सर्वात मोठा दुष्परिणाम आहे. पूर्वी वाहतुकीची साधने नसल्याने लोक पायी चालायचे. त्यामुळे त्यांना हाडांचे दुखणेही नसायचे, ते दीर्घायुष्यीदेखील असायचे, पण आता हातात गाडीची चावी आल्यापासून वेळ वाचतोय पण बहुमूल्य आरोग्य वाया जात आहे, याकडे दुर्लक्ष होत आहे. पायाच्या पिंडऱ्या या शरीरातील दुसरे हृदय असतात, त्या जितक्या मजबूत तितके हृदयाचे रक्ताभिसरण वाढून रक्ताचा दाब कमी होतो. स्नायू बळकट होतात. शरीरावरील ताण कमी होतो.
डॉ. अतुल्य पाटील, अस्थिरोगतज्ज्ञ, दुधाळी, कोल्हापूर
हे करुन पाहा
राेज सकाळ संध्याकाळ वॉकिंग, जॉगिंगला कंटाळा नको
किमान एक किलोमीटरच्या परिसरात काम असेल तर चालत जाणे
पहिल्या दोन मजल्यांसाठी लिफ्टचा वापर शक्यतो टाळा
बाजारातही भाजी खरेदीसाठी शक्यतो चालतच फिरावे
दैनंदिन कामासाठी सायकलचा वापर वाढवावा
शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्याेना सायकल सक्तीचीच करावी
लहान मुलांना सक्तीने चालण्यास प्रवृत्त करावे
गृहिणीनी घरातील जिन्यावरुनच चढउतार करावा
पायी चालणे शक्यच नाही त्यांच्यासाठी हे करता येईल
शक्य असेल तितके चालणे महत्त्वाचे आहे, तरीदेखील शक्य नसेल तर बसल्या जागेवर हातापायांची हालचाल करता येणारे व्यायाम करावेत, घरातल्या घरात चालण्याचा प्रयत्न करावा.