गडहिंग्लज :
माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्यासंदर्भात ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर केलेला आरोप निखालस खोटा आहे,असे स्पष्टीकरण कारखान्याच्या उपाध्यक्षांसह ७ संचालकांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिले आहे.
सोमय्या यांनी कराड येथील पत्रकार परिषदेत मंत्री मुश्रीफ यांनी
२ वर्षांपूर्वी केडीसीसी बँकेच्या माध्यमातून गडहिंग्लज कारखाना लिलावात घेतल्याचा आरोप केला आहे,तो पूर्णपणे चुकीचा आहे. त्यांचा गडहिंग्लज कारखान्याच्या आर्थिक व्यवहारांशी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही,असेही पत्रकात स्पष्ट केले आहे.
पत्रकात पुढे म्हटले आहे,केवळ गडहिंग्लज विभागाचा लोकप्रतिनिधी या नात्यानेच
८ वर्षापूर्वी मुश्रीफ यांनी
आर्थिक अरिष्टात सापडलेला
गडहिंग्लज कारखाना शेतकरी, कामगार,ऊसतोडणी- वाहतूकदार यांच्या हितासाठी पुण्यातील ब्रिस्क फॅसिलिटीज कंपनीला सहयोग तत्वावर चालवायला देण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यासंबंधीचा करार राज्य शासनाच्या परवानगीनेच साखर आयुक्तांसमोर झाला आहे. त्या प्रक्रियेशी केडीसीसी बँकेचा दुरान्वयेदेखील संबंध नाही.
ब्रिस्क कंपनीने ७० कोटींचा तोटा सहन करून ८ वर्षे कारखाना समर्थपणे चालविला. कराराची मुदत १० वर्षे असतानाही परवडत नसल्यामुळेच कंपनीने ६ महिन्यांपूर्वीच कारखाना संचालक मंडळाकडे सोपविला आहे.
पत्रकावर, गडहिंग्लज कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ. संग्रामसिंह नलवडे, संचालक व माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील -गिजवणेकर, संचालक अमर चव्हाण,विद्याधर गुरबे, दीपक जाधव, प्रकाश पताडे, संचालिका जयश्री पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
..............
जनतेला संभ्रमात टाकू नका !
सोमय्या यांना शेतकरी जीवंत राहिला पाहिजे याची तळमळच दिसत नाही. शेतकऱ्यांच्या व्यथा काय असतात, हे त्यांनी आधी जाणून घ्यावे. कोणतीही माहिती नसताना बेछूट वक्तव्य करून जनतेला संभ्रमात टाकू नये,असेही संचालकांनी पत्रकात म्हटले आहे.