कोल्हापूर : शहरात कचरा उठावात दिरंगाई, भटक्या कुत्र्यांचा वावर, फुटलेले ड्रेनेज यांसारख्या समस्यांनी नागरिक त्रस्त आहेत. नागरिकांनी वारंवार तक्रार करून देखील त्याची दखल घेतली जात नाही. एवढेच काय, तर दिलेल्या निवेदनांवर व स्मरणपत्रावर कार्यवाही होत नसल्याची बाब ‘आप’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी शुक्रवारी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या निदर्शनास आणून दिली.
ताराबाई पार्क येथील निवडणूक कार्यालयात झालेल्या बैठकीत शहरातील भटक्या कुत्र्यांची समस्या, त्यावर महापालिकेचे दुर्लक्ष यावर चर्चा झाली. रामानंदनगर येथील नाल्यातील बांधकामे हटविण्यास महापालिका दिरंगाई करत आहे, असे देसाई यांनी सांगितले. ताराबाई पार्क येथील ड्रेनेजलाईन नवीन टाकण्यासाठी प्रस्ताव मंजूर व्हावा, अशी मागणी युवाध्यक्ष उत्तम पाटील यांनी केली. यावर उपाय म्हणून १२ लाख रुपयांची ड्रेनेज योजना प्रस्तावित असल्याचे जलअभियंता साळुंखे यांनी सांगितले.
बैठकीस नगररचना सहायक संचालक रामचंद्र महाजन, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जलअभियंता अजय साळुंखे, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, उपशहर अभियंता बाबूराव दबडे आदी अधिकारी तर ‘आप’चे संतोष घाटगे, सूरज सुर्वे, गिरीश पाटील, राज कोरगावकर आदी उपस्थित होते.