कोल्हापूर : चिखली येथील पूरग्रस्तांना दिलेल्या पर्यायी जमिनीच्या सात-बारा व प्रॉपर्टी कार्डवर त्यांची नावे लावण्यात यावीत, आंबेवाडी ग्रामस्थांना पर्यायी जमीन द्यावी, अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे केली. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करून प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन दिले.
राजू शेट्टी म्हणाले, चिखली येथील पूरग्रस्तांना १९८९ साली शासनाने सोनतळी येथे पर्यायी जागा दिली. पण प्रॉपर्टीवर अजून नागरिकांचे नाव लागलेले नाही. त्यामुळे नागरिकांना बांधकाम, कर्जासाठी अडचणी येत आहेत. तसेच २०१९ मध्ये पडलेल्या घरांसाठी शासनाने जाहीर केलेले ९५ हजार रुपये मिळालेले नाहीत. आंबेवाडी येथील पूरग्रस्तांना भूखंड देण्यात येणार होते, पण कोणती जागा द्यायची हेच सांगितलेले नाही. तरी लाल फितीत अडकलेले प्रश्न मार्गी लावावेत, अशी मागणी त्यांनी केली.
---