कोल्हापूर : ‘स्मार्ट सिटी’ योजनेत १५ निकषांदारे गुणपद्धतीने वर्गीकरण करून शहरांची निवड होणार आहे. यानंतर या १५ पैकी दहा निकषांवर शहरवासीयांच्या नेमक्या गरजा जाणून घेऊन अग्रक्रमाने निधी कशासाठी हवा आहे, हे शासनास कळवायचे आहे. शहरवासीयांच्या या निकषांनुसार गरजा व सूचना जाणून घेण्यासाठी व मंगळवार व बुधवारी (दि.७ व ८) दोन दिवस विभागीय कार्यालयात थेट सूचना स्वीकारल्या जाणार आहेत. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे महापालिकेच्या या उपक्रमात सहभाग नोंदवावा, असे आवाहन माजी मंत्री सतेज पाटील यांनी शनिवारी केले. नूतन महापौर वैशाली डकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी सतेज पाटील बोलत होते. बैठकीसाठी उपमहापौर मोहन गोंजारे, आयुक्त पी. शिवशंकर, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त विजय खोराटे, आदींसह नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते. स्मार्ट सिटीत सहभागी शहरांना दरवर्षी केंद्र व राज्य शासनाकडून असे मिळून १५० कोटी, तर ५० कोटी महापालिकेच्या स्वनिधीतून असा २०० कोटी रुपयांचा निधी पाच वर्षांसाठी मिळणार आहे. योजनेत १५ निकषांद्वारे गुणांकन पद्धतीने शहरांची निवड केली जाणार आहे. या निकषांधारे महापालिकेच्या तयारीचा गुणतक्ता राज्य शासनाकडे १० जुलैपर्यंत पाठविला जाणार आहे; तर निधीची गरज असलेला अहवाल ३० जुलैपर्यंत सादर केला जाणार असल्याची माहिती आयुक्त पी. शिवशंकर यांनी बैठकीत दिली. (प्रतिनिधी)
‘स्मार्ट सिटी’साठी सूचना मागविणार!
By admin | Updated: July 5, 2015 01:11 IST