छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा स्वराज्याचे प्रतीक आहे. स्वातंत्र्यदिनाइतकाच तो दिवसही महत्त्वाचा आहे. म्हणूनच शिवस्वराज्य दिन साजरा करण्याचा निर्णय चांगलाच आहे. शासकीय पातळीवर तो साजरा होणे ही गोष्टही चांगलीच म्हणायला पाहिजे. दि. ६ जूनच्या दरम्यान शेतकरीवर्ग शेतीच्या कामात व्यस्त असतात. या शिवस्वराज्य दिन सोहळ्यात शेतकऱ्यांसह सर्वच घटकांतील लोक कसे सहभागी होतील याकडे लक्ष द्यायला पाहिजे. शिवाजी महाराजांचे विचार सर्वांना पुढे घेऊन जाणारे होते. त्यामुळे त्यांच्या नावाने नुसते सण, उत्सव, दिन साजरे करून थांबून चालणार नाही. यापुढील काळात त्यांच्या विचाराने राज्यात सुराज्य कसे निर्माण होईल याकडे लक्ष दिले पाहिजे.
शाहू छत्रपती,
छत्रपतींना अभिप्रेत संकल्पना -
शिवराज्याभिषेक दिन म्हणण्यापेक्षा शिवस्वराज्य दिन म्हणणे ही संकल्पा अधिक व्यापक आहे, जी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिप्रेत होती. शिवाजी महाराजांच्या काळात त्यांचे राज्य कदाचित छोटे असेल, पण ते सर्वांचे असावे आणि कल्याणकारी राज्य असावे. समाजातील शेवटच्या घटकातील व्यक्तीलासुद्धा हे राज्य आपले आहे असं वाटावं आणि त्यांनी सुखासमाधानाने जगावे असं महाराजांना वाटत होतं. त्या अर्थाने राज्याभिषेक दिनाऐवजी शिवस्वराज्य दिन असे संबोधण्यासाठी सरकारने घेतलेला निर्णय योग्य आहे.
डॉ. रमेश जाधव,
ज्येष्ठ इतिहास संशोधक