लोकमत न्यूज नेटवर्क
कोपार्डे : शिंगणापूर व हणमंतवाडी (ता. करवीर) येथे ग्रामपंचायत प्रशासनाने पाच दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर केला आहे . कोरोनाची वाढती संख्या या दोन्ही गावांत पाहता ग्रामस्थांनी जनता कर्फ्यूूूची कडक अंमलबजावणी करून सहकार्य करावे, असेे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे.
शिंगणापूर, हनुमंतवाडीत कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून, आठ दिवसांत तीन व्यक्तींचा बळी गेला आहे. कोरोना रुग्णांची साखळी तोडण्यासाठी मंगळवार (दि. ११)पासून शनिवार (दि. १५) पर्यंत गाव पूर्णपणे बंद करण्यात येत आहे. या कालावधीत गावाबाहेरची एकही व्यक्ती गावात येणार नाही आणि गावातील एकही व्यक्ती बाहेर जाणार नाही. त्यामुळे नोकरी, व्यवसायासाठी जाणाऱ्या ग्रामस्थांनी याबाबत खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अत्यावश्यक कामासाठी जाणाऱ्यांना अँटिजन टेस्ट प्रवेश करताना बंधनकारक राहील. या कालावधीमध्ये गावातील मेडिकल्स, दूध संस्था वगळता सर्व किराणा दुकाने, गिरण, भाजीपाला विक्री, इतर दुकाने, पतसंस्था व्यवहार बंद राहतील. तसेच नियमांचा भंग करणाऱ्या दूध संस्था व औषध दुकानांवर ५००० रुपये दंड करण्यात येईल. विनामास्क फिरणाऱ्यांवरही कारवाई होणार असल्याचे सरपंच प्रकाश रोटे व संग्राम भापकर यांनी सांगितले