कोल्हापूर : ‘राष्ट्रवादी’चे नेते शरद पवार यांचे राजकारण या निवडणुकीत संपले आहे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, खासदार राजू शेट्टी यांनी विजयानंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. ‘लोकसभा तो झाँकी है, अभी विधानसभा बाकी है..’ असा इशारा देत त्यांनी महायुतीच्या नेतृत्वाखाली विधानसभेतही भगवा फडकावून दोन्ही काँग्रेसची सत्ता उलथवून टाकू, असे जाहीर केले. सायंकाळी साडेचारच्या सुमारास शेट्टी मतमोजणी केंद्रात आले. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपला विजय सामान्य माणसाच्या वर्चस्वाचा विजय असल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘माझा विजय हा शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार मानणार्या सामान्य जनतेचा आहे. या निवडणुकीत माझा पराभव करण्यासाठी पवार यांच्यापासून मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत अनेकांनी देव पाण्यात घातले होते. ‘काहीही करून शेट्टी यांना पाडायचे,’ असा विडाच पवार यांनी उचलला होता; परंतु जनतेने इथेच नव्हे तर महाराष्ट्रातही त्यांच्या पक्षाचा दारुण पराभव करून त्यांचे राजकारण संपविले आहे. दोन्ही काँग्रेसचा पराभव पवारांच्या धोरणांचाच पराभव आहे. सदाभाऊ खोत यांनी ‘माढा’मध्ये चिवट झुंज दिली; परंतु यंत्रणा राबविण्यात कमी पडल्याने त्यांचा निसटता पराभव झाला. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जिल्ह्यातील सामान्य शेतकरी नेता बाहेरच्या जिल्ह्यात जाऊन पावणेपाच लाख मते मिळवतो, या त्यांच्या यशाला माझा सलाम. त्यांना निवडून आणू शकलो असतो तर त्यासारखा दुसरा आनंद नव्हता. संजय मंडलिक यांची उमेदवारीही अखेरच्या टप्प्यात जाहीर झाल्याचा फटका काही प्रमाणात बसल्याचे शेट्टी यांनी स्पष्ट केले.
शरद पवारांचे राजकारण संपले राजू शेट्टी यांचा घणाघात : काँग्रेसचा पराभव पवार यांच्या धोरणामुळेच
By admin | Updated: May 17, 2014 00:41 IST