कोल्हापूर : लेखक बाबा भांड यांनी लिहिलेल्या युगद्रष्टा महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या जीवनावरील कादंबरीत शाहू महाराज हे आपल्या संस्थानातील शस्त्रधारी देशभक्तांच्या हालचालींची बित्तंबातमी काढून ती मुंबई सरकारला तत्परतेने कळवत होते असा उल्लेख असून तो शाहू महाराज यांची बदनामी करणारा आहे. तो तातडीने वगळण्यात यावा अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार व इतिहास अभ्यासक डॉ. सुभाष देसाई यांनी केली आहे.
देसाई त्यासंबंधीच्या निवेदनात म्हणतात, भांड यांच्या साकेत प्रकाशनातर्फे प्रकाशित युगद्रष्टा महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या जीवनावरील कादंबरी खूप गाजली आहे. सयाजीराव गायकवाड यांचे छत्रपती शाहू महाराजांशी नाते संबंधही होते. दोघेही मोठे समाजसुधारक. ब्रिटिश राजवटीत या दोघांनी अनेक स्वातंत्र्य सैनिकांना मदत केली. एका बाजूला सनातनी ब्राह्मण समाजाचा विरोध आणि दुसऱ्या बाजूला ब्रिटिशांकडून सर्व प्रकारची मुस्कटदाबी या दोन्ही महाराजांच्या वाट्याला आली. युगद्रष्टा महाराजा या चरित्र ग्रंथांमध्ये पान २८३ वर एक परिच्छेद आहे. त्यात म्हटले आहे, " अरविंद यांचे बंधू क्रांतिकारक वारिंद्र घोष बडोदामध्ये आले आहेत. त्यावेळेला अरविंद घोष म्हणाले " बडोदा संस्थान आणि कोल्हापूर संस्थानांच्या प्रमुखात हाच मोठा फरक आहे, आपल्या संस्थानातील शस्त्रधारी देशभक्तांच्या हालचालींची बित्तंबातमी काढून ती मुंबई सरकारला तत्परतेने कळवण्याचे संस्थानिक कर्तव्य म्हणून कोल्हापूरच्या शाहू छत्रपतींनी जसे अनेक वर्षे चोख बजावले आहे पण, तसे सयाजीराव महाराज यांनी केल्याचा एकही पुरावा आढळत नाही. "
कादंबरीतील हे भाष्य कल्पनाविलास म्हणून बाबा भांड यांनी रचले आहे का, ते सत्याचे खरे दर्शन आहे हे भांड यांनी स्पष्ट करण्याची गरज आहे. कारण छत्रपती शाहू महाराजांनी ब्रिटिशांचे लांगुलचालन केले आणि देशभक्तांना वाऱ्यावर सोडले असा याचा अर्थ होतो. तो महाराज यांच्यावर अन्याय करणारा आहे. या संदर्भातले उदाहरण बाबा भांड यांनी पुराव्यानिशी द्यावे, अन्यथा अनवधानाने छत्रपती शाहू महाराजांची बदनामी केली अशी कबुली देऊन प्रसिद्ध झालेल्या सर्व आवृत्तीतून तो परिच्छेद तातडीने काढून टाकावा.