कागल : येथील शाहू सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात दहा लाख मेट्रीक टन उसाचे गाळप करत एक महत्त्वाचा टप्पा ओलांडला आहे. दहा लाख मेट्रीक टन गाळप करणारे राज्यात अगदी मोजकेच साखर कारखाने आहेत. विशेष बाब म्हणजे या दहा लाख मेट्रीक टनांपैकी आठ लाख मेट्रीक टन ऊस कारखाना कार्यक्षेत्रातीलच आहे.
चालूवर्षीच्या गळीत हंगामात प्रतिदिवस साडेसात हजार मेट्रीक टन क्षमतेने उसाचे गाळप केले जात आहे. दहा लाख मेट्रीक टन उसाचे गाळप आणि त्यासाठी कार्यक्षेत्रातच उसाची उपल्बधता हे स्वप्न कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष विक्रमसिंह घाटगे यांनी पाहिले होते. त्यांनी साडेबाराशे मेट्रीक टनावरून पाच हजार मेट्रीक टन गाळप क्षमता निर्माण केली होती. त्यांच्या निधनानंतर समरजित घाटगे यांनी गाळप क्षमता वाढविण्यासाठी प्राधान्य देत धाडशी विस्तारीकरण केले. गेल्या गळीत हंगामात सात हजार मेट्रीक टनाने यशस्वी गाळप केले. चालूवर्षी थेट इथेनाॅल निर्मितीच्या अनुषंगाने एक हजार मेट्रीक टनाने गाळप क्षमता वाढवून मागितली होती पण पाचशे मेट्रीक टन इतकीच मिळाली. या हंगामात मंगळवारी रात्री आठ वाजता हा यशस्वी टप्पा ओलांडला आहे. अजून कारखाना सुरू असून २८ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.
.....
१९८०- १९८१ ऊस गळीत हंगाम
गाळप क्षमता- १२५० मेट्रीक टन. एकूण गाळप - ७३ हजार ५१३ मे.टन. ८९,५४९ साखर पोती उत्पादन. कार्यक्षेत्रात उपलब्ध उस= ३२,००० मेट्रीक टन.
○ चालू गळीत हंगाम २०२०-२०२१
गाळप क्षमता- ७५०० मेट्रीक टन . एकूण गाळप- १०,००० मे.टन. ११ लाख ७५ हजार साखर पोती उत्पादन. कार्यक्षेत्रातील उपलब्ध ऊस ०८ लाख मेट्रीक टन.
-------------------‐-------------------
कोट..
दहा लाख मेट्रीक टन उसाचे गाळप करत कारखान्याने स्वर्गीय विक्रमसिंहराजेचें स्वप्न साकार केले आहे. ही स्वप्नपूर्ती माझ्यामुळे झालेली नाही. कारखान्याचे सभासद, उस उत्पादक शेतकरी, कामगार, अगदी ऊसतोडणी वाहतूक करणारे मजूर अशा विविध घटकांच्यामुळे झाली आहे. आजच्या क्षणी राजेसाहेब हवे होते. यापुढेही त्यांचा वारसा जपत राहूया.
- समरजित घाटगे अध्यक्ष, शाहू साखर कारखाना