कोल्हापूर : एकमेकांना खुन्नस देण्याच्या कारणावरून दोन गटांत झालेल्या सशस्त्र हाणामारीत पाच जण जखमी झाले. ही घटना यादवनगरात घडली. दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या. शनिवारी रात्री दोन्ही गटांतील सात जणांना अटक केली.
अटक केलेल्यांची नावे अशी : अमन मुबारक शेख (वय २९), सुहेल गनी मोमीन (२४), मधुकर प्रकाश दिंडे (४६), मंदार मधुकर दिंडे (२१), युवराज तुकाराम व्हल्लार-पाटील (३७ सर्व रा. यादवनगर). तसेच प्रथम जानकर, गौरव जानकर (दोघेही रा. यादवनगर).
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, यादवनगरातील अमन शेख हा आपल्या मित्रासोबत गप्पा मारत बसला होता. त्यावेळी प्रदीप जानकर व मित्र अनिकेत साळुंखे हे दुचाकीवरून तिथून जात होते. त्यांच्यात एकमेकांकडे बघण्याच्या आणि खुन्नस देण्यावरून वादाची ठिणगी पडली. वाद उफाळला आणि अमन शेख, सोहिल मोमीन, शकील जमादार यांच्यासह १० ते १२ जणांनी चाकू आणि एडक्यासारख्या धारदार शस्त्राने जानकर आणि साळुंकेवर हल्ला केला. या हल्ल्यात ते दोघे जखमी झाले. याप्रकरणी त्यांनी राजारामपुरी पोलिसांत फिर्याद दिली.
दरम्यान, अमन शेख यांच्या तक्रारीनुसार प्रथम जानकर, गौरव जानकर, आश्विन शेळके यांच्यासह आठ जणांनी तलवार, चाकू आणि बांबूच्या सहाय्याने हल्ला करून अमन शेख, त्याची आई आणि मावशी यांना जखमी केल्याची तक्रार पोलिसांत दिली. याप्रकरणी दोन्ही गटातील सात जणांना राजारामपुरी पोलिसांनी अटक केली आहे.