प्रशांत कोडणीकर : नृसिंहवाडी
शाळांचं ठरलं पण मंदिराची घंटी कधी वाजणार, असा प्रश्न भाविकांना पडला असून, सर्व भाविक मंदिर कधी उघडणार याची वाट पाहत आहेत. सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून तिसऱ्या लाटेची शक्यता कमी आहे. शासनाने मॉल वगैरे गर्दीच्या ठिकाणाला परवानगी दिली आहे. त्यामुळे मंदिरे लवकरात लवकर सुरू करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी भाविकांतून होत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लसीकरणाचा वेगदेखील वाढवला गेला आहे. ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू होतील असे शासनाकडून सांगण्यात आले आहेत. जिथे शाळेला परवानगी मिळते त्या ठिकाणी मंदिराला परवानगी अजूनही का नाही, असा प्रश्न भाविकांना पडला असून, लवकरात लवकर मंदिर सुरू व्हावे, अशी मागणी होत आहेत.
सध्या प्रवासाला व दुकानांना परवानगी असली तरी दर्शनासाठी आलेल्या भाविकांना प्रत्यक्ष मंदिरात दर्शन होत नाही. काही भाविक शिखराचे दर्शन घेऊन देखील परतत आहेत. पण त्यांना समाधान लागत नसल्याचे ते सांगतात आणि मंदिर बंद असल्यामुळे ७० ते ८० टक्के भाविक दर्शनालाच येत नाहीत. बरेच दिवस मंदिर बंद असल्याने भाविकांना दर्शनाची ओढ लागली आहे. मंदिरावर आधारित असलेले पूजा साहित्याचे, मिठाईचे व्यापारी तसेच हॉटेल व्यावसायिक, भक्त निवास या व्यापाराला तसेच पुरोहितांना देखील मंदिर बंद असल्यामुळे आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे लवकरात लवकर मंदिर सुरू करावे, अशी मागणी भाविकांतून होत आहे.