राजाराम लोंढे ल्ल कोल्हापूरकॉँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या करवीर मतदारसंघात दोन्ही काँग्रेस एकजुटीने लढले तर काय होऊ शकते, हे लोकसभा निवडणुकीने दाखवून दिले. लोकसभा निवडणुकीतील हे विजयी वातावरण विधानसभेतही परावर्तित करण्याचे आव्हान कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्यासमोर आहे. खासदार धनंजय महाडिक यांच्यासोबत असणारे सर्व घटक ‘पी. एन.’ यांच्याबरोबर राहणार का? हाच या लढतीतील विजय ठरवणारा मुद्दा आहे. पुनर्रचनेनंतर जुन्या सांगरुळ व करवीरमधील तीन-तीन जिल्हा परिषदेचे मतदारसंघ, पन्हाळ्यातील कळे व यवलूज, तर संपूर्ण गगनबावडा तालुका, अशी या मतदारसंघाची व्याप्ती आहे. ‘कुंभी’, ‘भोगावती’, ‘डॉ. डी. वाय. पाटील’ व ‘राजाराम’ या साखर कारखान्यांचे कार्यक्षेत्र या मतदारसंघात येते. गेल्या निवडणुकीत कॉँग्रेसचे पी. एन. पाटील, शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके व ‘शेकाप’चे संपतराव पवार हे रिंगणात होते, पण खरी लढत पाटील व नरके यांच्यात झाली. पाटील यांनी पाच वर्षांत आमदारकीच्या माध्यमातून केलेल्या कामाच्या बळावर जोरदार प्रयत्न केले. त्यांना जुना सांगरुळ व करवीर वगळता पन्हाळा व गगनबावडा तालुका नवीनच होता. संपूर्ण मतदारसंघच ‘कुंभी’ कारखान्याच्या कार्यक्षेत्रात येतो व तीन वर्षे ठेवलेला संपर्क याचा थेट फायदा चंद्रदीप नरके यांना झाला. अत्यंत काटाजोड झालेल्या लढतीत चंद्रदीप नरके यांनी ५ हजार ८१३ मतांनी विजय मिळवला. जनसुराज्य शक्ती पक्षाचा उमेदवार रिंगणात राहिला नाही, ही गोष्ट नरके यांच्या विजयात महत्त्वाची ठरली. गेल्या पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. पाटील यांनी पराभवानंतरही ‘गोकुळ’, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या माध्यमातून मतदारसंघात कायम संपर्क राखला आहे, पण एकूण देशात व राज्यात कॉँग्रेसबद्दलच्या नाराजीचा त्यांना त्रास होऊ शकतो. लोकसभा निवडणुकीत त्यांनी धनंजय महाडिक यांच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. गेल्यावेळी फटका बसलेल्या जुन्या करवीर व पन्हाळ्यात त्यांनी चांगल्या प्रकारे पॅचवर्क करण्याचा प्रयत्न केला आहे. हा मतदारसंघ शहराच्या लगतचा असल्याने येथे शहरातील लाट थडकतेच. त्यामुळे महायुतीचे वारे व आमदार नरके यांची संपर्क मोहीम त्यांना रोखावी लागेल. विरोधी आमदार असतानाही नरके यांनी मतदारसंघात चांगली विकासकामे केली आहेत. त्यांचा जनसंपर्कही चांगला आहे. लोकसभेला त्यांनी शिवसेनेच्या संजय मंडलिक यांच्यासाठी प्रचारयंत्रणा राबवली. परंतु, मताधिक्य मिळवून देण्यात ते मागे राहिले. दहा हजार मतांनी आपण मागे राहू, असे वाटत असताना हे मताधिक्य ३४ हजारापर्यंत गेले. त्यांच्यादृष्टीने हा धक्का आहे. लोकसभेला बाजूला गेलेले ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक अरुण नरके विधानसभेला त्यांच्याबरोबर असतील. गेल्यावेळी नरके गगनबावड्यातून ३३४२ मतांनी मागे होते. आता त्यांनी स्वतंत्र गट निर्माण करत परिस्थिती सुधारली आहे, पण भोगावती खोऱ्यात अजूनही ते कमकुवत आहेत. संपतराव पवार हे रिंंगणातून बाजूला गेल्याने ‘शेकाप’तर्फे येथून कोण, याची चर्चा सुरू आहे. ‘शेकाप’चे पंचायत समिती सदस्य राजेंद्र सूर्यवंशी यांनी संपर्क मोहीम राबविली आहे. पक्षाकडून विचार झाला तर ठीक, अन्यथा रिंंगणात उतरायचेच, या ईर्ष्येने ते कामाला लागले आहेत. जनसुराज्य पक्षाने निवडणूक लढवण्याची घोषणा केली असली तरी उमेदवार निश्चित नाही. बाजार समितीचे माजी उपसभापती नामदेव पाटील (कुडित्रेकर) हे इच्छुक आहेत. ऐनवेळी वेगळाच चेहरा समोर येण्याची शक्यता आहे. ‘शेकाप’ व जनसुराज्य यांच्या आघाडीतर्फे राजेंद्र सूर्यवंशी लढण्यास इच्छुक आहेत. जुना करवीर व गगनबावडा तालुक्यांत गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना मानणारा मोठा गट आहे. त्यांची मदत पी. एन. पाटील यांना महत्त्वाची ठरु शकते. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मधुकर जांभळे व जिल्हा बॅँकेचे माजी अध्यक्ष पी. जी. शिंदे हे राष्ट्रवादीची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. गेल्यावेळी राष्ट्रवादीचे अनेक शिलेदार थेट ‘शिवसेने’च्या छावणीत गेल्याने आमदार नरके यांना त्याचा फायदा झाला. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला प्रामाणिकपणे आघाडी धर्म पाळावाच लागणार आहे. पण ‘भोगावती’ शिक्षण मंडळाच्या निवडणुकीमुळे वातावरण पुन्हा दूषित झाले आहे. ते सुधारण्याचे काम पाटील यांना करावे लागणार आहे. लोकसभा निवडणुकीतील मताधिक्यामुळे कॉँग्रेस कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. या निवडणुकीतील सर्व घटक त्यांच्याबरोबर राहिल्यास विजय अवघड नाही. परंतु, आजपर्यंत छुपी काँग्रेसच पराभव करते असा त्यांचा अनुभव आहे. ती परंपरा खंडित करण्याचे पी.एन.पाटील यांचे प्रयत्न राहतील. सत्तारुढ सरकारबद्धल जनमाणसांत असलेली नाराजी ही आमदार नरके यांच्यादृष्टीने महत्त्वाची जमेची बाजू आहे. (उद्याच्या अंकात कागल मतदारसंघ)
विजयी हवा टिकवण्याचे ‘पी. एन.’ यांना आव्हान
By admin | Updated: June 11, 2014 01:21 IST