लोकमत न्यूज नेटवर्क
सेनापती कापशी : कोरोनाच्या महामारीवेळी राज्याला ऑक्सिजनची असलेली गरज ओळखून मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्या खासगी कारखान्यावर ऑक्सिजन प्रकल्प उभारून रुग्णांना नवसंजीवनी देण्याचे काम केले आहे. संकटसमयी रयतेच्या संरक्षणासाठी धावून जाणाऱ्या सरसेनापती संताजी घोरपडे यांचा पराक्रम सांगणाऱ्या या कारखान्याने खऱ्या अर्थाने माणुसकीचा धर्म निभावल्याचे गौरवोद्गार राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी काढले.
ते बेलेवाडी काळम्मा (ता. कागल) येथील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर उभारलेल्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
मंत्री जयंत पाटील पुढे म्हणाले, कोरोना महामारीत सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याने अनंत अडचणींवर मात करून उभारलेला हा प्रकल्प राज्यातील अन्य साखर कारखाने व सहकारी संस्थांसाठी आदर्शवत ठरेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याने हाती घेतलेला हा प्रकल्प महत्त्वाकांक्षी आहे. कारखान्याने दीड कोटी रुपये खर्चून हा अत्याधुनिक ऑक्सिजन प्रकल्प उभारला आहे. प्रति तास ४१ किलोप्रमाणे, दररोज एकूण एक हजार किलो ऑक्सिजन निर्मिती क्षमता आहे. शुद्धतेचे प्रमाण तब्बल ९५ टक्के असलेल्या वैद्यकीय वापरासाठी उपयुक्त या प्रकल्पामधून दररोज शंभर जंबो सिलिंडर भरली जाणार आहेत.
स्वागत कार्यकारी संचालक संजय शामराव घाडगे यांनी केले तर प्रास्ताविक अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी केले. यावेळी भैय्या माने, युवराज पाटील, गणपतराव फराकटे, शशिकांत खोत, विकास पाटील, सूर्याजी घोरपडे, कारखान्याचे सभासद, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
फोटो:- बेलेवाडी काळम्मा (ता. कागल) सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर उभारलेल्या ऑक्सिजन प्रकल्पाचे उद्घाटन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, भैय्या माने, युवराज पाटील, गणपतराव फराकटे, नवीद मुश्रीफ आदी उपस्थित होते. फोटो - संदीप तारळे, गलगले