शिरोली
: टोप, ता. हातकणंगले येथील गायरान जमिनीत दगड उत्खननाच्या मुद्द्यावरून सोमवारी (दि.२०) झालेल्या धुमश्चक्रीच्या घटनेवरून टोप ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. वडार समाज वारंवार दहशत दाखवत मारामारी करत आहेत. त्यामुळे या घटनांना पायबंद घालण्यासाठी या पुढे जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा टोपमधील प्रमुख मंडळी व तरुणांनी दिला. टोपमध्ये दोन गटांत झालेल्या हाणामारीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी ग्रामस्थांनी कल्लेश्वर मंदिरात बैठक घेतली. यावेळी हाणामारीच्या घटनेचा निषेध करण्यासाठी सोमवारी गाव बंद ठेवून मूक मोर्चा काढण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. टोप गाव दगड खाणी व क्रशर व्यवसायासाठी प्रसिद्ध असून दगड खाणीत उत्खनन व वाहतूक व्यवसायातून आलेली बेपर्वाई सामाजिक शांतता बिघडवण्यास कारणीभूत ठरत आहे. त्यासाठी सर्वसामान्य कष्टकरी समाजाला ठराविक मंडळींनी वेठीस धरले आहे. त्यामुळे त्यांना पायबंद घालणे गरजेचे असल्याचा सूर बैठकीत उमटला. गायरान जमिनीत कोणत्याही परिस्थितीत अवैध उत्खनन करू द्यायचे नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी मांडली. गायरान जमिनीत उत्खनन झाल्यास परिसरातील जलस्रोत्र वृक्षसंपदा नाहीसी होईल. जनावरांचा चारा, पशू-पक्ष्यांचा नैसर्गिक अधिवास संपुष्टात येईल. बोअर ब्लास्टमुळे परिसरातील शेती, रहिवासी घरे यांचे नुकसान होते. अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे अपघाताचे प्रमाण वाढण्याची भीती आहे. त्यामुळे गायरानात वृक्ष लागवड करा, जनावरे शेळ्या मेंढ्यासाठी चराई क्षेत्र, मुलांना खेळासाठी मैदान यासाठी आरक्षित ठेवण्याची मागणी प्रशासनाकडे करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
सातत्याने होणाऱ्या या घटनांमुळे गावात संतापाचे वातावरण असून उत्स्फूर्तपणे नागरिक या बैठकीला एकवटले होते. बैठकीला शेकडोंच्या संख्येने युवक व गावातील सर्वपक्षीय प्रमुख नेतेमंडळी उपस्थित होते.