आजरा : आवंडी धनगरवाडा रस्त्याच्या कामामुळे विकासापासून वंचित भागाला न्याय मिळाला असून यापुढे पर्यटनाला चालना मिळणार आहे, असे स्पष्ट प्रतिपादन आजरा-राधानगरी-भुदरगडचे आमदार प्रकाश आबीटकर यांनी केले. ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत चित्री धरण फाटा ते आवंडी धनगरवाडा रस्त्याच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते. आवंडी धनगरवाड्यावरील महिलांनी आमदार आबीटकर यांसह मान्यवरांचे कुंकूमतिलक व आरती ओवाळणी करून स्वागत केले. आमदार आबीटकर यांचा ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला. चित्री धरणाच्या बांधकामानंतर या रस्त्याला मोठा निधी देऊन काम होत असल्याबद्दल कॉ. संपत देसाई यांनी समाधान व्यक्त केले. चित्री प्रकल्प व परिसर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. स्वातंत्र्यानंतरही धनगरवाड्यावर रस्त्याचे ग्रामस्थांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण होणार आहे. रस्त्याबरोबर, वीज व अन्य मूलभूत सुविधा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे, असेही आमदार आबीटकर यांनी सांगितले.
यावेळी पंचायत समिती सदस्या रचना होलम, राजू होलम, जनार्दन टोपले, बाबू भेडगे, सुरेश होडगे, रणजित सरदेसाई, विजय थोरवत, प्रा. अनिल मगर, वृषाल हुक्केरी, डी. टी. पवार, रामचंद्र पाटील, शिवसेना डिलाई रोड शाखाप्रमुख गोपाळ खाडे, बयाजी येडगे, गोविंद गुरव, संजय शेणवी, रवींद्र भाटले, प्रवीण सरदेसाई, शिवाजी आढाव, गंगाराम कोकरे, गंगाराम येडगे, बजाजी मिसाळ यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो ओळी : आवंडी धनगरवाडा (ता. आजरा) येथील कार्यक्रमात बोलताना आमदार प्रकाश आबीटकर. शेजारी संपत देसाई, बाबू येडगे, जनार्दन टोपले, गोपाळ खाडे आदी उपस्थित होते.
क्रमांक : ०८०२२०२१-गड-०३