जयसिंगपूर : कोल्हापूर-सांगली रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम तातडीने व्हावे व शेतकऱ्यांना शेतजमिनीचा मोबदला मिळावा, यासाठी योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी आमदार उल्हास पाटील यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे केली.नागपूर येथे सार्वजनिक बांधकाममंत्री पाटील यांची भेट घेऊन आमदार पाटील यांनी कोल्हापूर - सांगली रस्ता चौपदरीकरणप्रश्नी निवेदन दिले. चौपदरीकरणाचे काम २०११-१२ मध्ये मंजूर झाले असून, हा रस्ता २०१४ पर्यंत पूर्ण होणे गरजेचे होते. मात्र, सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीकडून आतापर्यंत रस्त्याचे ४० टक्केकामदेखील पूर्ण झालेले नाही. कंपनीने कामामध्ये हलगर्जीपणा करून शासनाचे नुकसान केले आहे. अर्धवट रस्त्याच्या कामामुळे आतापर्यंत अनेकांना जीव गमवावे लागले आहेत. कंपनीकडून शेतकऱ्यांच्या शेत जमिनीवर ताबा घेऊन काम सुरू आहे; परंतु अद्याप शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळाला नाही. रस्त्याच्या अपुऱ्या कामांमुळे वेगवेगळी आंदोलने होत आहेत. शासनाने वेळीच दखल घेऊन संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलवावी व तातडीने चौपदरीकरणाचे काम पूर्ण करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना शेत जमिनीचा मोबदला देण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे. यावेळी शिरोळचे तंटामुक्त समिती अध्यक्ष पांडुरंग माने, बंटी देसाई, दीपक ढवळे, संजय पाटील उपस्थित होते. (प्रतिनिधी)
चौपदरीकरणाचा प्रश्न मार्गी लावा
By admin | Updated: December 19, 2014 23:32 IST