कोल्हापूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नातील एकूण १४ हुतात्म्यांच्या वारसांना १७ लाख ५७ हजार रुपयांचे निवृत्तीवेतन राज्य शासनाने मंजूर केले आहे. दरमहा दहा हजार रुपये निवृत्तीवेतन, ५०० रुपये वार्षिक प्रवास खर्च व प्रत्येकी ५ हजार रुपये इतर आनुषंगिक खर्च अशी रक्कम दिली जाते.
शासनाने मूळ १७ लाख ५७ हजार रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद केली आहे. त्यातील १४ लाख रुपये एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ वर्षाकरिता वाटप करण्यात आले आहेत. ही रक्कम संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आल्याचे शासन आदेशात म्हटले आहे. सामान्य प्रशासन विभागाने १८ तारखेला यासंबंधीचा आदेश काढला आहे. या हुतात्म्यांमध्ये कोल्हापूरचे ९, मुंबई शहरातील ३ आणि पुणे व रत्नागिरी शहरातील प्रत्येकी एक असे लाभार्थी आहेत. त्यानुसार कोल्हापूर- १० लाख ८ हजार, मुंबईसाठी ३ लाख ३१ हजार व पुणे आणि रत्नागिरीसाठी १ लाख २० हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत.