कोल्हापूर : मुंबईतील रसायन तंत्रज्ञान संस्थेतर्फे (आय.सी.टी.) रंकाळ्यातील पाणी शुद्ध करण्याचा प्रकल्पास १४ जूनपासून सुरुवात झाली. मात्र, ठरल्याप्रमाणे महापालिकेने अद्याप वीज जोडणी दिली नसल्याने डिझेलवरची यंत्रणा बंदसदृश स्थितीतच आहे. यंत्रामुळे दूषित पाणी शुद्धिकरणाचे चांगले परिणाम असूनही धोरण आंधळेपणाचा फटका बसत आहे. उद्घाटनावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह प्रशासनाने रंकाळा शुद्धिकरणाच्या केलेल्या आणाभाका निव्वळ गप्पाच ठरल्याचे चित्र आहे.शुद्धिकरण प्रकल्पाचे आय.सी.टी.चे प्राध्यापक व प्रकल्प संशोधक डॉ. अनिरुद्ध पंडित यांच्या ‘हायड्रो डायनॅमिक कॅव्हिटेशन’ या तंत्रज्ञानावर आधारित रंकाळ्यातील पाणी शुद्धिकरणाची योजना हाती घेण्यात आली. महापालिका या प्रकल्पासाठी फक्त वीज पुरवठा करणार आहे. सेवाभावी निधीतून संस्थेचे कुलगुरू व कोल्हापूरचे सुपुत्र जी. डी. यादव यांनी प्रकल्पासाठी लागणारा २५ लाखांचा निधी जमा केला आहे. पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रकल्पाचे दिमाखदार उद्घाटनही झाले. त्यावेळी रंकाळ्याला निधी कमी पडू देणार नाही, आदी आश्वासनांची बरसात झाली. मात्र, प्रत्यक्षात जलशुद्धिकरण यंत्र डिझेलचा तुटवडा व विजेच्या जोडणीस होत असलेल्या विलंबामुळे बंद अवस्थेतच आहे. (प्रतिनिधी)जलशुद्धिकरणाचे चांगले परिणाम समोर आले आहेत. त्याची शास्त्रीय चाचणी घेतली जाणार आहे. केंद्र नेमके कुठे लावायचे याची जागा अद्याप निश्चित नाही. यंत्र लावलेल्या खणीमध्ये रंकाळ्यातील पाणी आल्यानेच डिझेलची अधिक मात्रा लागत असल्याची शक्यता आहे. जागा निश्चित झाल्यानंतर वीज जोडणी घेण्यात येणार आहे.- नितीन देसाई (अतिरिक्त आयुक्त, महापालिका)
रंकाळा जलशुद्धिकरणाच्या गप्पाच
By admin | Updated: July 10, 2015 23:50 IST