कोल्हापूर : पूरग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास राज्य सरकार कमी पडणार नाही, थोडा संयम ठेवावा, अशा शब्द मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांना दिला आहे. त्यामुळे शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून अजून थोडा संयम ठेवावा, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी शुक्रवारी केले.
राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना आठ दिवसात नुकसान भरपाईची रक्कम मिळाली नाही तर मंत्र्यांना गाडीतून फिरू देणार नाही, असा इशारा शेट्टी यांनी दिला असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यावेळी पालकमंत्री पाटील म्हणाले, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व राजू शेट्टी यांची बैठक झाली आहे. त्यावेळी भरपाई देण्यास सरकार कमी पडणार नाही, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. तेव्हा शेट्टी यांनी आणखी थोडा संयम ठेवावा. आम्हीच तुम्हाला गाडीत घेऊन फिरवू.
राज्यात अद्यापही पाऊस सुरू आहे. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करण्यात अडचणी येत आहेत. एकदा पाऊस कमी होऊ द्या, सर्वांचे पंचनामे पूर्ण होऊ द्या. त्यानंतर भरपाई देण्यात येईल. याविषयी मंत्रिमंडळाच्या बैठकीत वारंवार चर्चा झालेली आहे. नुकसान भरपाई देण्यात सरकार कुठेही कमी पडणार नाही, असे पाटील म्हणाले.