लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी दिवसभर पावसाची रिपरिप राहिली. गगनबावड्यासह अनेक तालुक्यांत जोरदार सरी कोसळल्या. या पावसाने खरीप पिकांना दिलासा मिळाला आहे.
यंदा माॅन्सूनने वेळेवर हजेरी लावली असली तरी त्याला ताकद लावत नव्हती. खरीप पिकांची उगवण झाली तर काही ठिकाणी उगवण व्हायची आहे. त्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी काहीसा हवालदिल झाला होता. सोमवारपासून वातावरणात बदल हाेऊन अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी जोरदार तर, काही ठिकाणी भुरभुर राहिली. मात्र, मंगळवार सकाळपासून ढगाळ वातावरणासह पाऊस सुरू झाला. मध्यंतरी दोन तास उघडीप दिली असली तरी दुपारनंतर कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाने सुरुवात केली. दिवसभर रिपरिप राहिली तर गगनबावडा, राधानगरी, शाहूवाडी, पन्हाळ्यात जोरदार पाऊस झाला.
कोल्हापूर शहरात दिवसभर उघडझाप राहिली. दुपारनंतर जोरदार सरी कोसळल्याने वातावरणात काहीसा गारवा पसरला होता.
पावसाने सुरुवात केल्याने खरीप पिकांना दिलासा मिळाला आहे. उगवण न झालेल्या भात, भुईमूग, ज्वारी, सोयाबीनला हा पाऊस पोषक आहे. उगवण झालेल्या खरिपाला पाणी मिळाल्याने वाढीसाठी मदत होणार आहे.
रेनकोट, छत्र्या बाहेर
पावसाने सुरुवात केल्याने मंगळवारी सकाळी कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांना भिजतच घर गाठावे लागले. त्यामुळे रेनकोट व छत्र्या बाहेर पडल्याचे चित्र कोल्हापूर शहरात पहावयास मिळाले.
फोटो ओळी :
१) कोल्हापूर जिल्ह्यात खरिपाची उगवण चांगली झाली असून आंतरमशागतीच्या कामांना वेग आला आहे. (फोटो-१५०६२०२१-कोल-रेन व रेन०१) (छाया- नसीर अत्तार)