कुरुंदवाड : भाजप सरकारने मराठा आरक्षण कायद्याच्या चौकटीत बसवून जाहीर केले होते. मात्र या आरक्षणाची न्यायालयीन लढाई लढण्यात महाआघाडी सरकार अपयशी ठरले आहे. सध्याचे सरकार खोटी आश्वासने देऊन जनतेची फसवणूक करीत असल्याची टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केली.
येथील मगदूम सांस्कृतिक सभागृहात भाजप कार्यकर्ता मेळावा व संपर्क बूथ अभियानात प्रमुख मार्गदर्शक म्हणून घाटगे बोलत होते. अध्यक्षस्थानी विठ्ठलराव नाईक-निंबाळकर होते.
घाटगे म्हणाले, सत्ता गेली म्हणून कार्यकर्त्यांनी खचून न जाता पक्षवाढीसाठी जोमाने कामाला लागावे. प्रत्येक बूथनोंदणीत संख्येपेक्षा पक्षासाठी काम करणारे कार्यकर्ते महत्त्वाचे आहेत. यावेळी माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे, मयूर उद्योगसमूहाचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य राजवर्धन नाईक-निंबाळकर, भगवान घाटगे, पृथ्वीराज यादव यांची भाषणे झाली.
यावेळी तालुक्यातील पक्षाच्या नूतन ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला. मेळाव्यास नगरसेवक उदय डांगे, सूरगोंड पाटील, राजेंद्र देशमुख, मुकुंद पुजारी, महावीर तकडे, पोपट पुजारी, आनंदराव साने उपस्थित होते. अन्वर जमादार यांनी स्वागत केले, तर डॉ. कुमार पाटील यांनी आभार मानले.
फोटो - २१०२२०२१-जेएवाय-०५
फोटो ओळ - कुरुंदवाड (ता. शिरोळ) येथील मेळाव्यात समरजित घाटगे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विठ्ठलराव नाईक-निंबाळकर, रामचंद्र डांगे, डॉ. संजय पाटील उपस्थित होते.