दिंडनेर्ली : गेली १२ वर्षांपासून वडाप पूर्ण बंद होऊन गावागावांतील प्रादेशिक घटकांशी एकजीव झालेली जनता गाडी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आदेशानंतर आता दिंडनेर्ली, नंदगाव, गिरगावकडे फिरकणारच नसल्याने ‘वाट पाहीन, पण एस.टी.नेच जाईन’ ही खूणगाठ मनाशी बाळगलेले विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, प्रवासी मात्र हवालदिल झाले आहेत. ते आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. शहरातील रिक्षा स्टॉपवरती एस.टी.चा थांबा असल्याने होणारा आर्थिक तोटा व महापालिका क्षेत्रात शहरांतर्गत प्रवासी वाहतूक करण्याचा अधिकार फक्त केएमटीला असल्याचे कारण देत प्रादेशिक परिवहन कार्यालयाने आदेश दिले आहेत, तर शहरात बस थांबे नसल्याने या मार्गावरील एस.टी. फेरी बंद करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे.त्यामुळे सकाळी सहापासून सायंकाळी दहापर्यंत प्रवाशांशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण झालेली एस.टी. बंद होणार असल्याने दैनंदिन प्रवास करणारे नोकरदार, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक या निर्णयाने संतप्त झाले आहेत. १४ वर्षांपूर्वी केएमटी सेवा विस्कळीत झाल्याने वडाप जोरात सुरू झाले; पण बेभरवशाचे व धोकादायक वडाप वाहतुकीविरोधात आवाज देत विद्यार्थ्यांनी, प्रवाशांनी आंदोलन केल्याने जनता गाडी सुरू झाली होती. या एस.टी.बसच्या सेवेचा शेतकरी वर्गालाही मोठा फायदा झाला. शेतीमालाला गावालगतच कोल्हापूरची बाजारपेठ उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांची सोय झाली. ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी यांना ५० टक्के सवलत व कामगार पासही सवलतीत मिळत असल्याने सर्वच घटक आनंदात होते. पण, आताच्या निर्णयानुसार केएमटी सुरू झाल्यास सवलती मिळण्यात मर्यादा आहेत.या संतप्त प्रतिक्रियेचे रूपांतर आंदोलनात होण्याची चिन्हे दिसत आहेत. नेहमीच चर्चेतील दक्षिण मतदारसंघातील गावांना एस.टी.ची सेवा मुकणार आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींपैकी कोण धावून येणार का, याची वाट प्रवाशांना पहावी लागणार आहे. (वार्ताहर)
जनता गाडीमुळे नाराजी
By admin | Updated: January 10, 2015 00:14 IST