कोल्हापूर : हद्दवाढीचा प्रस्ताव महापालिकेकडून निवडणुकीनंतरच पाठविण्यात येणार आहे. दरम्यान, मागील वेळी पाठवलेला १८ गावांचा प्रस्तावाची अद्ययावत माहिती संकलित करणे आणि परिपूर्ण प्रस्ताव तयार करण्याचे कामे केले जाणार आहे.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकेला हद्दवाढ संदर्भात फेर प्रस्ताव देण्याची सूचना केली आहे. मात्र, महापालिकेच्या सभागृहाची मुदत संपली असून निवडणूक होत नाही, तोपर्यंत क्षेत्रात बदल करता येणार नाही, असे निर्देश राज्य निवडणूक आयोगाचे आहेत. दुसरीकडे हद्दवाढ समर्थक कृती समितीकडून प्रस्ताव पाठविण्याची मागणी जोर धरत आहे. यामुळे महापालिका प्रशासन कचाट्यात सापडले आहे.
चौकट
शासनाला पत्र पाठवून अडचणी कळवणार
मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रस्ताव पाठवण्याची सूचना केली असली तरी तांत्रिक अडचण समोर आल्या आहेत. त्यामुळे कोणत्या कारणामुळे प्रस्ताव पाठवू शकत नाही, याची माहिती नगरविकास मंत्री शिंदे यांना पत्राने कळवली जाणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली.
प्रतिक्रिया
हद्दवाढ संदर्भात यापूर्वी कोणता प्रस्ताव पाठवला, हद्दवाढ का झाली नाही. प्राधिकरण नियुक्तीवेळी अधिसूचना काढताना काय सूचना केल्या आहेत. या सर्व बाबींचा माहिती घेतली जात आहे. किती गावांचा प्रस्ताव पाठवावा, कधी पाठवणार याबाबत सध्या तरी कोणताच निर्णय झालेला नाही. जुन्या सर्व फाईलाची मागणी नगररचना विभागाकडे केली असून याचा अभ्यास करुनच प्रस्ताव पाठवली जाईल.
डॉ. कादंबरी बलकवडे, प्रशासक, महापालिका
प्रतिक्रिया
राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार निवडणुकीनंतरच प्रस्ताव पाठवणे योग्य होणार आहे. दरम्यान, परिपूर्ण प्रस्ताव करण्याचे काम केले जाईल. किती गावांचा समावेश करावा याबाबत सध्या कोणताही निर्णय नाही. मात्र, मागील वेळी १८ गावे आणि दोन औद्योगिक वसाहताचा पाठवलेला प्रस्तावाचा अभ्यास सुरु असून त्यामध्ये अद्ययावत माहिती संकलित करत आहे.
निखील मोरे, उपायुक्त, महापालिका