लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : यंदाच्या महापुरात वाहनांपेक्षा स्थावर मालमत्ता व त्यातील मालाचेच अधिक नुकसान झाले असून, अंदाजे ४०० कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जाणकारांकडून व्यक्त होत आहे. विमा कंपन्यांकडे आलेल्या दाव्यांमध्ये वाहनांपेक्षा ७० टक्के प्रमाण हे मालमत्तेचे नुकसान झाल्याच्या दाव्यांचे आहे.
दोन वर्षांपूर्वीही पूरक्षेत्रातील घरांसमोर उभी केलेली दुचाकी व चारचाकी वाहनांसह मालमत्ता बुडून अनेकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. त्यामुळे यंदाच्या महापुरात काय स्थिती होती, हे ‘लोकमत’ने जाणून घेतले. यंदा वाहनांपेक्षा अधिक नुकसान मालमत्तेचे झाले आहे. याबाबतचे दावे विमा कंपन्यांकडे पूर ओसरल्यानंतर येऊ लागले आहेत. नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी व्यापारी, आस्थापना आणि वैयक्तिक प्रकारचे विमा अनेक नागरिक काढतात. विशेषत: व्यापाऱ्यांमध्ये इमारतींसह त्यातील मालाचाही विमा करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वादळ, वारा, पाऊस आणि पुरात नुकसान झाले तर त्याची नुकसानभरपाई संबंधित विमा कंपनी परताव्याच्या रूपाने विमाधारकाला देते. त्यामुळे जीवन विमासह आणि स्थावर मालमत्ता, व्यवसाय, वाहन आदींचा सर्वसाधारण विमा उतरविण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचा फायदा पुरासारख्या परिस्थितीत विमाधारकांना मिळतो. त्यामुळे असा विमा अनेकांनी उतरवला आहे. त्यानुसार विविध विमा कंपन्यांकडे असे दावे दाखल होऊ लागले आहेत. मागील २०१९च्या पुरात ३,५००हून अधिक वाहनांचे नुकसान झाले होते. त्यांचे दावे विमा कंपन्यांकडे दाखल झाले होते. यंदा वाहनांपेक्षा मालमत्ता नुकसानाचे दावे सर्वाधिक दाखल झाले आहेत. त्यांचे सर्वेक्षण करण्याचे काम कंपन्यांनी नेमून दिलेले सर्व्हेअर करत आहेत. त्यांच्या प्राथमिक अंदाजानुसार, जिल्ह्यात ४०० ते ५०० कोटी रुपयांचे सर्वच प्रकारचे नुकसान झाले आहे.
यंदा वाहनांची काळजी अधिक
शहरातील शाहूपुरी, नागाळा पार्क, लक्ष्मीपुरी, सिद्धार्थ नगर, बापट कॅम्प, कदमवाडी, आदी ठिकाणी नागरिकांनी पुराचा अंदाज घेऊन आपली वाहने सुरक्षित ठिकाणी लावली. त्यामुळे वाहनांचे नुकसान होण्याचे प्रमाण कमी झाले.
दावा असा दाखल करता येणार
संबंधित मालमत्ता, वाहन आदीचे नुकसान झाले असेल तर त्या विमाधारकाला आपल्या पाॅलिसी कागदपत्रांसह प्रांताधिकारी, तहसीलदार यांचे ना हरकत प्रमाणपत्र व तलाठी, पोलीस पाटील यांची पंचनामा कागदपत्रे विमा कंपनीत सादर करावी लागणार आहेत. याशिवाय व्यवसाय प्रमाणपत्र, बँकेचे कर्ज असेल तर त्यासंबंधीची कागदपत्रे, खरेदी पावत्या, कर पावत्याही सत्यप्रतीत सादर करणे गरजेचे आहे.
कोट
यंदाच्या पुरात वाहनांपेक्षा सर्वाधिक नुकसान मालमत्तेचे झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार ४०० कोटींहून अधिक नुकसान पुरात झाले आहे.
- विजय रेळेकर, सर्व्हेअर
कोट
काही गावांमध्ये जिल्हा प्रशासनाने तीन महिन्यांपूर्वी पुरात घरांमध्ये थांबता येणार नाही, अशा नोटीसही बजावल्या होत्या. तरीसुद्धा अनेक नागरिक तेथेच होते. त्यामुळे अशा नागरिकांना विमा संरक्षणात दावा दाखल करून परतावा मिळणे कठीण आहे.
- शंकर जाधव, विमा अधिकारी, न्यू इंडिया ॲश्योरन्स कंपनी, कोल्हापूर