विक्रम पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
करंजफेण : पन्हाळा तालुक्यातील पश्चिम परिसरात ग्रामपंचायत निवडणूक प्रचार तोफा थंडावल्या असून, कार्यकर्ते रात्रभर खडा पहारा देण्यासाठी जागू लागले असून, जोडण्या लावण्यास सुरुवात झाली आहे.
पोर्ले तर्फ ठाणे, धबधबेवाडी, निकमवाडी, खडेखोळ, इंजोळे, सोमवार पेठ, वाघवे, तिरपण, दिगवडे, तेलवे, नणुंद्रे, उंड्री, निवडे, नांदगाव, नांदारी, परळी, सोनुर्ले या गावामध्ये ग्रामपंचायत निवडणुका होणार असून, जनसुराज्यशक्ती पक्षाचे आमदार विनय कोरे गट व शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील गट या पारंपरिक गटामध्ये अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती पाहायला मिळणार आहे. बाबासाहेब पाटील (आसुर्लेकर) यांनीदेखील काही गावामध्ये आपला गट निवडणूक रिंगणात उतरविला आहे. निकमवाडी, दिगवडे, परळी, सोनुर्ले या ठिकाणी काही मोजक्या जागेसाठी निवडणूक होणार आहे. पोर्ले तर्फ ठाणे येथे प्रकाश पाटील गटाने विकासकामांचा डोंगर उभा केला असतानादेखील विजयासाठी संघर्ष करावा लागत आहे. नणुंद्रे येथे तिरंगी लढतीने निवडणुकीतील रंगत वाढली असून, उपसभापती रश्मी कांबळे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कोरे गट पुन्हा एकवेळ मुसंडी मारण्याच्या तयारीत आहे. उंड्री गावामध्ये युवकांनी विजयाची वज्रमूठ बांधली असून, विकासकामांचे मुद्दे घेऊन प्रस्थापितांना अक्षरश: घाम फोडला आहे.